चिपळूण शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, शहरातून व्यापारी आणि लहान व्यावसायिकांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी त्यांच्याशी सल्ला मसलत करून तेथे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी बहादूरशेख नाका ते डीबीजे कॉलेज परिसरापर्यंत पिलर उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.
उड्डाणपुलाच्या पिलरमुळे शहरातील पूर्वीच्या रस्त्याचे दोन वेगळे भाग झाले आहेत. दोन्ही भागातील रस्त्याला यापुढे सर्विस रोड अशी ओळख असणार आहे. महामार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या वेळी रस्त्यालगत असलेल्या दुकानांमुळे रुंदीकरणासाठी आवश्यक तेवढी जागा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे रुंदीकरणामध्ये वेळ न दवडता तेथे उड्डाणपूल करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
शहरात उड्डाणपूल होण्यापूर्वीच बहादूरशेख नाका ते डीबीजे कॉलेजपर्यंतच्या व्यापाऱ्यांना होणाऱ्या नुकसानीचा अंदाज आणि अनुभव येऊ लागला आहे. त्यामुळे या भागातील अनेक व्यावसायिक आर्थिक संकटात आले आहेत. काहींनी तर आपली दुकाने व्यवस्थित चालत नसल्याने ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तर काहींनी दुसरीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
उड्डाणपूल बांधण्याच्या निर्णयामागे व्यापाऱ्यांचे आणि ग्रामस्थांच्या मालमत्तेचे कमीत कमी नुकसान व्हावे हा त्यामागचा प्रमुख हेतू होता. व्यापारी आणि ग्रामस्थांनी हा पर्याय स्वीकारला; परंतु दुसऱ्या बाजूने उड्डाणपूल झाल्यानंतर मुंबईतून गोव्याकडे आणि गोव्यातून मुंबईकडे जाणारी वाहने चिपळूणमध्ये थांबणार नाहीत हा सर्वात मोठा तोटा अनेकांच्या लक्षात आला नाही. पिलर उभारणीचे काम सुरू होताच व्यापाऱ्यांवर आणि छोट्या विक्रेत्यांवर लगेचच मंदीचे सावट येऊ लागल्याची जाणीव झाली. आता कापसाळपासून कळंबस्तेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वेगवेगळे व्यवसाय सुरू आहेत. प्रामुख्याने हॉटेल, पेट्रोलपंप आणि वाहनदुरुस्तीची दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत.
चिपळूणहून मुंबईकडे आणि मुंबईहून चिपळूणकडे जाणारा माणूस जेवणासाठी चिपळूणमध्ये अवश्य थांबतो. वाहनांमध्ये हवा भरायची असेल किंवा वाहनांचे सुटे पार्ट घ्यायचे असतील तरी वाहनचालक चिपळूणला प्राधान्य देतात. पूर्वी केवळ दुपदरी रस्ता होता त्यामुळे कोणत्याही बाजूला जाऊन वाहन थांबवणे वाहन चालकांसाठी सोयीचे होते. आता पिलर उभारणीचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याची दोन भागात विभागणी झाली. एका बाजूच्या वाहनाला दुसऱ्या बाजूला जायचे असेल तर बहादूरशेख नाक्यावर जाऊन वळसा घ्यावा लागतो. इंधन खर्च वाढत असल्यामुळे वाहनचालक शहरात न थांबता पुढे निघून जातात. त्यामुळे अनेक व्यावसायिक अडचणीत आले आहेत.