जगबुडी नदीपात्रामध्ये नेमका कोण कचरा फेकतो ? याचा छडा अजूनही लागलेला नाही. नदीपात्रात तरंगणाऱ्या कचऱ्यामुळे पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनीही देखील पाठ फिरवली आहे. नदीपात्रात विशेषतः रात्रीच्या सुमारास गुपचूप येऊन कचरा फेकणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. याचमुळे नेमकी कारवाई कोणावर करायची? असा पेच नगर प्रशासनासमोर उभा राहीला आहे. बारमाही वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्रात प्रशासनाच्या नजरेत धूळ फेकून कचरा टाकणाऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. तरंगणाऱ्या कचऱ्यामुळे जगबुडी नदीपात्र दुषित झाले असून, नागरिकांच्या आरोग्यावर धोक्याची टांगती तलवार कायम आहे.
नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे कचरा फेकणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. त्यातच जगबुडी नदीपात्राच्या स्वच्छतेबाबत देखील प्रशासन कानाडोळा करत असल्याने नदीपात्र विद्रूप बनत चालले आहे. तरंगणाऱ्या कचऱ्यामुळे नदीपात्र दूषित बनत चालल्याने नदीपात्राच्या स्वच्छतेवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे जगबुडी नदीपात्राला लागलेले संवेदनशीलतेचे ग्रहण सुटून जगबुडी नदीपात्र कचऱ्याच्या विळख्यातून मोकळा श्वास घेण्याची चिन्हे निर्माण झाली होती; मात्र या साऱ्या बाबींचा नगर प्रशासनाला विसरच पडलेला दिसत आहे.
जगबुडी नदीपात्रात कचरा तरंगत असतानाही नगर प्रशासनाने अजूनतरी नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी फारसे लक्ष दिलेले नाही. जगबुडी नदीपात्रात कचरा अडवण्यासाठी मध्यभागी दोन दोरखंड टाकून कचरा एकत्रित करण्याची नवी शक्कल लढवण्यात आली आहे; मात्र कचरा फेकणाऱ्यांवर कारवाईसाठी नगरपालिकेने अद्याप कोणतीही कडक ठोस पावले उचलली नसल्याने नदीपात्र दिवसेंदिवस अस्वच्छ होत आहे. रात्रीच्या सुमारास फळविक्रेते, मटण, चिकन व्यावसायिकांसह अन्य काहीजण नदीपात्रात कचरा फेकून पळ काढत असल्याची बाबदेखील पुढे आली आहे. संपूर्ण शहर चकाचक राहत असले तरी जगबुडी नदीपात्राच्या स्वच्छतेकडे मात्र लक्ष देण्यास प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची जनसामान्यात चर्चा सुरु आहे.