वर्षाच्या सुरुवातीलाच शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी धक्का देत शिंदे गटाची स्थापना केली. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे-फडणवीस युती सरकार राज्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यावर एकनाथ शिंदे प्रथमच रत्नागिरी तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सामंत यांचे हे या कार्यक्रमाची जोशाने तयारी करताना दिसत आहेत. त्यामुळे अल्पावधीत शिंदे गटाने तालुक्यात आणि जिल्ह्यात चांगलीच मोट बांधली असल्याचे निदर्शनास येत आहे.
शिंदे गटाची ताकद आता गावाच्या काना कोपऱ्यातून वाढू लागली आहे. पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे पूर्वीपासूनच सर्वांशी सलोख्याचे संबंध असल्याने, त्यांची स्वतंत्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे. त्यात काही निष्ठावंत शिवसैनिक त्यांच्याबरोबर आल्याने शिंदे गट अधिक मजबूत होताना दिसत आहे.
राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुक्रवार दि.१६ च्या दौऱ्याची जोरदार तयारी केली आहे. सुमारे २५ ते ३० हजार कार्यकर्त्यांची विक्रमी सभा करण्याचे नियोजित आहे. त्यासाठी एसटी विभागाच्या सुमारे १३० एसटी गाड्याचे बुकिंग केल्या आहेत. मतदारसंघातील जिल्हा परिषद गटनिहाय ३ हजार कार्यकर्त्यांचे उद्दिष्ट प्रमुख पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यांच्याही स्वतंत्र गाड्या असणार आहेत. उद्योगमंत्र्यासह भैया सामंत, शिंदे गटाचे प्रमुख पदाधिकारी दिवसरात्र नियोजनामध्ये व्यस्त दिसून येत आहेत.
गटाचे प्रणेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रथमच रत्नागिरीमध्ये आगमन होत असल्याने त्यांचे जल्लोषात आणि राजकीय ताकदीने स्वागत करण्याचा पालकमंत्र्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी शहरात जोरदार स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली आहे. प्रमोद महाजन क्रीडांगणावर सभा होणार असल्याने तो मार्ग चकाचक केला जात आहे. दुभाजक स्वच्छ करून त्यांना रंग दिले जात आहेत. शहराच्या प्रवेशद्वारापासून ते सभास्थळापर्यंत सर्वत्र बॅनर लावण्यात आले आहेत. भगवे झेंडे फडकवण्यात आले आहेत. स्वागत कमानी उभ्या राहिल्या आहेत.