कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोल्हापूरची महालक्ष्मी व शिर्डीसह राज्यातील अनेक मंदिरात आजपासून मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला कोविडच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या विमानतळावरही प्रवाशांची तपासणी करण्याचे देखील आदेश जारी करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील मोठ्या मंदिरांमध्ये नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी भाविक गर्दी करण्याची शक्यता आहे. मात्र कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील मंदिर प्रशासनांनी मास्कबाबत नियमावली बनवण्यास सुरुवात केली आहे. परदेशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीनंतर शिर्डीचे साईबाबा संस्थान सतर्क झालं आहे. दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावं आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचं आवाहन मंदिर प्रशासनाने केलं आहे.
कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात आजपासून कर्मचाऱ्यांसाठी मास्क सक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मास्क सक्तीचा निर्णय घेतला आहे. मात्र भाविकांना अद्याप मास्क सक्ती करण्यात आलेली नाही. जगभरात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना आजपासून मास्क सक्ती होणार आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थानाने गणेशभक्तांनी दर्शनासाठी येताना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. तर प्रशासनाकडून गणेशभक्तासांठी पाच हजार मास्क खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
चीनमधील कोरोनाचा कहर पहिला असता, भारतामध्ये देखील केंद्र आणि राज्य शासनाकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष सतर्कता बाळगण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.