शासनाच्या विविध योजना राबवण्यासाठी विविध विभाग नेमलेले असतात. परंतु, आरोग्य विषयक अनेक कामे हि गावागावात पोहोचण्यासाठी आशा आणि गटप्रवर्तक विभागाकडे नसून देखील त्यांच्यावर जबरदस्तीने काम लादून करण्यास भाग पाडले जाते. आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत यापूर्वी अनेक वेळा आशा व गटप्रवर्तक महिलांना ज्या कामाचा मोबदला दिला जात नाही असे काम करून घेऊ नये असे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत.
हर घर दस्तक या योजनेच्या कामाचा मोबदला मिळत नाही. त्यामुळे या योजनेचे काम काम करु नये अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. तरीही दि. ३० नोव्हेंबर २०२२ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकाचा गैर अर्थ काढून ई कार्ड काढण्याबाबत आशा व गटप्रवर्तकांना काम सांगितले जात आहे. इतकेच नव्हे तर दररोज गटप्रवर्तक महिलांना काही तालुका आरोग्य अधिकारी फोन करून काम करण्यास सांगत आहेत. दररोज किती ई कार्ड काढले त्याच्याबद्दलची माहिती द्यावी लागत आहे
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत ई कार्ड वितरण करण्यासंदर्भात कोणतेही काम आशा व गटप्रवर्तकांना सांगू नये. तसेच सक्तीने काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. अशी मागणी महाराष्ट्र आशा, गटप्रवर्तक संघटनेतर्फे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
वास्तविक या कामाचा व गटप्रवर्तकांच्या कामाचा काही संबंध नाही. या योजनेच्या परिपत्रकात कुठेही नमूद केलेले नाही की हे काम आशा व गटप्रवर्तक महिलांनी करावे. तरीसुद्धा हे काम महिलांना सांगितले जात आहे. हे काम ग्रामपंचायतीमार्फत करुन घ्यावयाचे आहे. तरीसुद्धा असे काम करण्यास सांगणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती निवेदनाद्वारे संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी, जनरल सेक्रेटरी सुमन पुजारी, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विजया शिंदे, विद्या भालेकर, पल्लवी पारकर यांनी केली आहे.