अमरावती कारागृहातून पलायन केलेला कुख्यात गुंड साहिल काळसेकरला रत्नागिरी पोलिसांनी अखेर पकडले. रत्नागिरी जिल्ह्यात विविध गुन्ह्यांमध्ये अडकलेला आणि पोलिसांवर हल्ला करणारा साहिल काळसेकर चिपळूण शहरापासून काही अंतरावर असलेल्या शिरलबन मोहल्ल्यात वास्तव्याला होता. तो मूळचा चिपळूण तालुक्यातील नायशी येथील आहे. नायशी येथील पाणी कर्मचारी घाग याच्या खुनाच्या आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. खून, दरोडा, चोऱ्या, खुनी हल्ला असे २८ गंभीर गुन्हे काळसेकरवर दाखल आहेत. अमरावती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
रत्नागिरी येथे पोलिस कॉन्स्टेबल वाजे यांच्यावर हल्ला केला होता. त्याला चावा घेऊन त्याच्या अंगावर जांभा दगड टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याची वाढती गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता, त्याला अमरावती येथे कारागृहात ठेवण्यात आले होते. तिथे तो जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना जून महिन्याच्या अखेरीस त्याने आणखी दोघांबरोबर पलायन केले होते. त्याचप्रमाणे साहिलने न्यायालयामध्ये न्यायाधीशांवरही सुनावणीवेळी चप्पल फेकली होती. तसेच अनेक लोकांवर हल्ला केल्याचे गुन्हे त्याच्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. तो मूळ गावी चिपळूणला आश्रयला येण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सतर्क झाली होती.
अमरावती कारागृहातून दोन गुंडांच्या मदतीने पलायन केलेला कुख्यात गुंड साहिल काळसेकर याला रत्नागिरी पोलिसांनी थरारक पाठलाग करून कोकणनगर येथे पकडले आहे. जिल्ह्यात तो आश्रयाला येण्याची दाट शक्यता असल्याने सर्व पोलिस यंत्रणा अलर्ट होती. दरम्यान, काळसेकर रत्नागिरीत आल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्याच्या ठाव ठीकाण्याची गुप्त माहिती मिळवून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. अमरावती पोलिसांना त्याची माहिती दिली असून, अमरावती पोलिसांचे पथक काळसेकरला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत.
पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण बर्गे, आशिष भालेकर, पंकज पडवे, गणेश सावंत यांचे पथक शहरातील कोकणनगरला रवाना झाले. टपरीवर चहा पीत असताना पोलिस दिसल्यानंतर काळसेकरने पाठीमागे बांधावरून उडी टाकून पोबारा केला. मात्र, पोलिस पथकाने दहा मिनिटे थरारक पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.