राजापूर तालुक्यातील जैतापूर येथील परिसरात कापरी कमळे बहरली असून, या मार्गावरील येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांची व पर्यटकांची नजर या फुलांनी आकर्षित होत आहे. पाऊस सुरू झाला की, कोकणातल्या कातळसडे हिरव्या रंगांत रंगून जातात. काही दिवसातच त्यावर विविध रंगाच्या फुलांची विलक्षण नक्षी उमटते. साताऱ्याच्या कास पठारालाही मागे काढेल, अशा रंगबिरंगी रानफुलांनी अवघे कोकण नटून जाते. कापरी कमळ हेही असेच एक पावसाळी रानफूल आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात येणाऱ्या जैतापूर परिसरात ही फुले फुलली आहेत. जैतापूर- हातिवले मार्गावरील जांभळवाडी स्टॉपशेजारी सध्या ही फुले बहरली आहेत. दुपारनंतर ही फुले कोमेजत असल्याने सकाळच्या वेळीच ही फुले पाहणे इष्ट ठरते.