27.2 C
Ratnagiri
Tuesday, October 22, 2024
HomeKhedकशेडी बोगद्यातील गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

कशेडी बोगद्यातील गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

बोगद्याच्या वरच्या भागातून गळणाऱ्या पाण्याचा निचरा गटाराद्वारे करण्यात येणार आहे.

मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात १४ ठिकाणी लागलेल्या गळतींमुळे दोन्ही बाजूने मार्गस्थ होणाऱ्या वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. बोगद्यातील गळत्यांमुळे राष्ट्रीय महामार्ग खाते खडबडून जागे झाले आहे. बोगद्यातील गळत्या थोपवण्यासाठी तातडीने ‘ग्राऊटींग’चे काम हाती घेण्यात आले आहे. वरच्या भागातून गळणाऱ्या पाण्याचा गटाराद्वारे निचरा करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होण्यास महिनाभराचा कालावधी लागणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले.

बहुचर्चित कशेडी बोगद्यातून दोन्ही बाजूंनी वाहनचालकांचा प्रवास सुस्साट अन् आरामदायी झालेला असतानाच ५ दिवसापूर्वी कोसळलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीनंतर बोगद्यात तब्बल १४ ठिकाणी गळत्या सुरू झाल्या आहेत. या गळत्यांमुळे वाहनचालकांचा जीव टांगणीवर असून अनेक वाहनचालकांनी बोगद्याकडे पाठ फिरवली आहे. तर काही वाहनचालक जीव मुठीत धरून बोगद्यातून मार्गस्थ होत आहेत. बोगद्यातील गळत्यांमुळे दुतर्फा वाहतुकीतील वाहनांचा वेगही पुरता मंदावला आहे. गळत्या थोपवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या हालचाली राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून सुरू झाल्या आहेत.

त्यानुसार गळत्या रोखण्यासाठी बोगद्यात ग्राऊटींगचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. बोगद्याच्या वरच्या भागातून गळणाऱ्या पाण्याचा निचरा गटाराद्वारे करण्यात येणार आहे. बोगद्यातून झिरपणारे पाणी वाहनांवर पडणार नाही, या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून सांगण्यात आले. बोगद्यातील गळती रोखण्यासाठी ग्राऊटींगसह अन्य कामे वेगात सुरू आहेत. ही कामे पूर्ण होण्यास महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular