कोकणातील पारंपरिक जाखडी लोककला त्याचबरोबर १५० कलावंताचा गीत, संगीत, मराठी सण उत्सव परपंरांवर आधारित ‘मराठी बाणा’ कलाकृतीने रत्नागिरीकर मंत्रमुग्ध झाले. मराठी बाणा कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती सातासमुद्रापार नेण्याची किमया केली आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात अशोक हांडे यांचे लेखन आणि संकल्पना असणारा ‘मराठी बाणा’ हा ७० एमएम मराठी कार्यक्रम रविवारी (ता. ११) रात्री झाला. तत्पूर्वी, कोकण नमन कलामंचचे अध्यक्ष पी. टी. कांबळे यांनी जाखडी पारंपरिक कलेच्या माध्यमातून नमन, स्तवन, गण, गवळण सादर केली.
मराठी बाणाच्या माध्यमातून खऱ्या अथनि मराठी सण, उत्सव, परंपरा हे भूपाळी, शेतकरी गीत, वासुदेव, वारकऱ्यांची दिंडी, धनगरी नृत्य, ठाकर नृत्य, कोळीनृत्य, आगरी नृत्य, भजन, गवळण, भारूड, दहीहंडी, गणेशोत्सव, लेझिमच्या माध्यमातून गीत, संगीत आणि नृत्याविष्कारातून सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पालकमंत्री सामंत म्हणाले, महाराष्ट्राची संस्कृती सातासमुद्रापार नेण्याची किमया महाराष्ट्राच्या विशेषतः कोकणच्या सुपुत्राने अशोक हांडेनी केली आहे.
जागतिक पातळीवरही त्यांचे नाव घेतले जाते. आपली मराठी आणि मराठीची संस्कृती ही कोकणात न राहता जगभरात गेली आहे. १५ तारखेपर्यंत चालणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवाचा रत्नागिरीकरांनी आस्वाद घेऊन अशीच भरभरून दाद द्यावी. या वेळी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, बिपिन बंदरकर, हेमंत वणजू उपस्थित होते.