रत्नागिरी तालुक्यातील नाणीज गावाची ओळख नरेंद्रचार्यजी महाराजांची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. पण सध्या काही वेगळ्याच गोष्टीसाठी नाणीज गावाची चर्चा सुरू आहे. नाणीज तळीवडी येथे बेकायदेशीर दारू बाळगल्या प्रकरणी नुकतेच एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला. नाणीज हे तीर्थक्षेत्र असून येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक तरुण दारू सोडण्यासाठी येतात, असे असताना बेकायदेशीर दारूची विक्री होत आहे. त्यामुळे येथील सर्व बेकायदेशीर दारूधंदे बंद करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
अनेकवेळा तक्रारी देऊनही नाणीजला ५-६ ठिकाणी राजरोसपणे बेकायदेशीर दारूची विक्री केली जाते. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. नाणीज तळवाडी येथील पंडित नामक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी छापा टाकून मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसनाईक राकेश तटकरी यांनी तक्रार दिली. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
या दारू विक्रीविरुद्ध वेळोवेळी महिलांनी आवाज उठवला आहे. पोलिसांनीही अनेकवेळा छापे टाकून कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत; मात्र हे व्यवसाय कायमस्वरूपी बंद होत नाहीत. गावातील तसेच पंचक्रोशीतील अनेक तरुण यामुळे व्यसनाधीन झाले आहेत. रसायनयुक्त ही हातभट्टीची दारू अनेकांच्या जीविताला हानिकारक ठरत असून काहींचा मृत्यू देखील ओढवला आहे. त्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत. दारूची उधारी न चुकवणाऱ्यांवर देखील वसुलीसाठी जबरदस्ती केली जात असल्याची तक्रारी देखील त्या महिलेविरुद्ध आल्या आहेत.
पोलिसांच्या कडक कारवाईनंतर नाणीजमध्ये पाच-सहा वर्ष धंदा बंद करण्यात होता. त्यानंतर या महिलेने पुन्हा जुन्या मठासमोर दारूधंदा सुरू केला आहे. नाणीजची दारू कायमस्वरूपी बंद करण्याबाबत पोलिस ठाण्यात वेळोवेळी तक्रारी दिल्या आहेत. पोलिसही अनेकवेळा छापे टाकतात. कारवाई करतात; पण हा व्यवसाय कायमस्वरूपी बंद होत नाही. तो बंद करण्याची मागणी जोर धरत आहे.