साखरीनाटे येथील मच्छीमार बांधवांनी आता रिफायनरीविरोधी आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. साखरीनाटे आणि राजवाडी येथील ग्रामस्थांनी नुकतेच निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना भेटून रिफायनरी व क्रूड ऑईल टर्मिनल विरोधातील ठराव सादर केले. यापुढे बारसू सोलगाव येथील ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून रिफायनरी विरोधात संघर्ष करण्याचा निर्धार केला आहे.
साखरीनाटे मच्छीमार सहकारी सोसायटी व साखरीनाटे महिला मच्छी व्यावसायिक सहकारी सोसायटी यांच्यासोबत राजवाडी ग्रामसभेने रिफायनरी, पेट्रोकेमिकल झोन, क्रूड ऑइल टर्मिनल, बंदर, सिंगल पॉईंट मुरिंग आदी प्रकल्प आंबोळगड-तिवरे किनारी नको असे ठराव केले. त्याच्या प्रती शासनापर्यंत पोहचवण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. या वेळी मजिद गोवळकर, कारीम फणसोपकर, मुहिद खादू, नंदकुमार हळदणकर, मुबारक गैबी, सिकंदर हातवडकर, सिराज बांदिवडेकर, सिद्धेस सातुर्डेकर, सलीम सोलकर आदी उपस्थित होते.
काही वर्षापूर्वी जैतापूर येथील रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात तीव्र लढा उभारण्यात आला होता. या प्रकल्पविरोधात सातत्याने झालेल्या आंदोलनामध्ये साखरीनाटेतील मच्छीमारांचा मोठा सहभाग असे. एका आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका मच्छीमाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता मच्छीमार बांधवांनी बारसू सोलगाव येथील ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून रिफायनरी प्रकल्पविरोधात संघर्ष करण्याचा निर्धार कला आहे.