कोकण दौऱ्यावर आलेल्या युवानेते आदित्य ठाकरे यांच्या सार्वजनिक सभेनंतर अनेक घटनांच्या मालिका सुरु झाल्या आहेत. त्यामध्ये ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी दापोलीत शिंदे गटात सामील झालेल्या रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक टीका केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटताना दिसत आहेत.
दापोली येथील एका कार्यक्रमात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केलेल्या टीकेचे पडसाद राज्यभरात विविध प्रकारे उमटले आहेत; कुठे रामदास कदम यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे, तर कुठे त्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन देखील झाले तर काही ठिकाणी शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. रामदास कदम यांच्या ठाकरे कुटुंबीयांवरील विधानाचा शिवसेनेकडून याचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांनी मात्र रामदास भाईंच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे, असा दावा केला आहे. त्या वाक्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे, राज्यामध्ये होत असलेलं राजकारण पाहून मुद्दामहून रामदास भाईंच्या विरोधात शिवसैनिकांना भडकवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असा आरोप योगेश कदम यांनी केला.
बाळासाहेब आणि माँसाहेबांच्या बाबतीत कुठलाही वाईट विचार रामदास भाईंच्या डोक्यामध्ये कधीच नव्हते आणि कधी येणार पण नाहीत. रामदास भाईंची बदनामी करण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत त्याचा मी निषेध करतो, भाईंच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे, त्या वाक्याला वेगळ वळण देऊन अर्थ काढला जात आहे. असं योगेश कदम म्हणाले.
तर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी देखील रामदास कदम यांनी शिवसेना आणि भास्कर जाधव यांच्यावर केलेल्या टीकेला यांनी उत्तर दिलं आहे. रामदास कदम यांना तात्त्काळ वेड्याच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करायला हवे असं जाधव म्हणाले. शिंदे गटाची प्रतिमा रामदास कदमांमुळे मलिन होतेय त्यांना पदावरून हटवा अशी विनंती जाधवांनी केली आहे.