27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

चिपळूण शहरामध्ये मगरीचा वावर, पेट्रोलपंपात आढळली

वाशिष्ठी नदीतील गाळ काढताना शहरातील सखल भाग...

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...
HomeRatnagiriकाळबादेवी खाडीवरील पुलासाठी माती परीक्षण - रेवस-रेड्डी सागरी महामार्ग

काळबादेवी खाडीवरील पुलासाठी माती परीक्षण – रेवस-रेड्डी सागरी महामार्ग

रेवस-रेड्डी सागरी महामार्गावर काळबादेवी येथील खाडीवर पूल उभारण्यासाठी माती परीक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. भू तांत्रिक तपासणीसाठी बोअरवेल पाडण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून (एमएसआरडीसी) या महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. याला एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाला राज्य शासनाने मान्यता दिली. त्यानंतर वर्षभराने एप्रिल महिन्यात भूसंपादन प्रक्रियेचेही आदेश आले आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उभारण्यात येत असलेल्या सागरी मार्गावरील सुमारे १६५ किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. उर्वरित रस्ता दुपदरी असेल.

या परिसरातील शहरांच्या ठिकाणी बाह्य वळणे घेण्यात येणार आहेत. सागरी मार्गाला सलगता येण्यासाठी खाडीवर नव्याने पूल उभारले जाणार आहेत. त्यात रत्नागिरीतील काळबादेवी खाडीचा समावेश आहे. काळबादेवी ते मिऱ्या या सुमारे ६०० मीटरहून अधिक अंतर असलेल्या खाडीवरील पूल उभारण्यासाठी माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. एमएसआरडीसीच्या पत्रानुसार, स्टाफ कन्सल्टंटची नेमणूक केली असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. यामध्ये भू-तांत्रिक आणि मृदा अन्वेषण केले जाणार आहे.

हा अहवाल आल्यानंतर पुलाचे पिलर उभारण्यासाठी भूसंरचना कशी आहे हे निश्चित होईल. दरम्यान, रत्नागिरी ते गणपतीपुळे मार्गावर शिरगाव आणि या मार्गावर परिसरातील रस्ता अरुंद असल्यामुळे काळबादेवी खाडीवर पूल उभारून किनारी भागातून रस्ता बनवण्याबाबत काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही हालचाली सुरू झाल्या होत्या; परंतु याला काही कोटींचा खर्च अपेक्षित असल्यामुळे तो मागे पडला होता.

भाट्ये येथेही पूल – सागरी महामार्गावर काही ठिकाणी चौपदरीकरण केले जाणार आहे. त्यात जयगड ते पावस या २० किलोमीटर मार्गाचा समावेश आहे. काळबादेवीबरोबरच भाट्ये येथेही पूल उभारण्यात येणार असल्याचे एमएसआरडीकडून सांगण्यात आले. येथील माती परीक्षणही लवकरच केले जाईल. शहरांना बाह्य वळण देऊन सागरी महामार्ग नेण्यात येणार आहे. त्यामुळे रत्नागिरी शहराच्या बाहेरून हा मार्ग जाणार असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular