आपल्या आई वडिलांना सांभाळले नाही, त्यांची जबाबदारी मुलांनी नाकारली तर ग्रामपंचायतीमध्ये वारस नोंद रजिस्टरला त्यांची नोंद केली जाणार नाही. असा ठराव रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायतीने सर्वांनुमते टाळ्यांच्या गजरात पारित केला आहे. उमराठची विशेष ग्रामसभा सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११५ ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडली. त्याचबरोबर शक्यतो परप्रांतियांना जागा विकू नका असा ठराव देखील करण्यात आला. या ग्रामसभेमध्ये जी मुले, मुली आपल्या आईवडिलांना सांभाळत नाहीत, औषधोपचार करण्यात हेंळासांड करतात, गावाकडे असलेल्या आई वडिलांना विचारत नाहीत, पैसे पाठवत नाहीत, म्हातारपणी वृध्दाश्रमात रवानगी करतात.
अशा मुलासंदर्भात त्यांच्या आईवडिलांकडून, नातेवाईकांकडून, शेजाऱ्याकडून ग्रामपंचायतीकडे तक्रार आल्यास त्या वृध्द माता-पित्याच्या स्वकष्टार्जित मालमतेला किंवा संपत्तीला वारस म्हणून नाव लावण्यासाठी त्यांची मुले आली तर ग्रामपंचायत तशी नोंद घालणार नाही, असा ठराव एकमताने टाळ्यांच्या गजरात पारित करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये महसूल आणि ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी यांना सुद्धा या ठरावाची प्रत पाठवून देण्याचे ठरले. ग्रामपंचायतीकडून माहिती घेऊनच वारस प्रकरणे मंजूर करावीत. जी मुले आईवडिलांना सांभाळत नसतील त्यांना शासकीय सुविधांचा लाभ देऊ नये, असेही ठरविण्यात आले.
परप्रांतियांना जागा विकू नये – या विशेष ग्रामसभेत वडिलोपार्जित जमीन जागा तातडीची गरज नसेल तर, केवळ पैशांच्या लोभापायी परप्रांतीयांना विकू नये, असा आणखी एक महत्त्वाचा ठराव सर्वांनुमते एकमताने मंजूर करण्यात आला. हा ठराव मंजूर करताना एखाद्या ग्रामस्थाला जागा विकायचीच असेल तर त्याने आपल्या जागेतून १० फुट रुंदीचा रस्ता अन्य ग्रामस्थांना वहिवाट करणे सोपे व्हावे म्हणून सोडवा, असा तिसरा ठरावही मंजूर करण्यात आला. या विशेष ग्रामसभेला सरपंच जनार्दन आंबेकर, उपसरपंच सुरज घाडे, महिला सदस्या व सदस्य शशिकांत आंबेकर, विद्यमान तंटामती अध्यक्ष कृष्णा गोरिवले, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संदीप गोरिवले.
वसंत कदम, पोलीस पाटील वासंती आंबेकर, शैलेश सैतवडेकर सर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, सर्व वाडी प्रमुख, तसेच बहुसंख्य स्त्री-पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते. ही सभा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत उमराठचे कर्मचारी नितीन गावगंग, प्रशांत कदम, साईश दवंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सरपंच जनार्दन आंबेकर यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांनी मनमोकळ्यापणे चर्चेत भाग घेतल्याबद्दल आभार मानून घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देऊन समारोप केला.