श्रध्दापूर्वक नदीची झालेली पूजा व आरती… नदीची महती विषद करीत केलेली स्वच्छता… त्यानंतर नदीपात्रात सोडलेले दिवे… पावित्र्य अबाधित राखण्यासाठी घेतलेली सामुदायिक प्रतिज्ञा यामुळे रायपाटण संगनाथेश्वर परिसरातील अर्जुना नदीचा घाट अमावास्येला लखलखून निघाला… अर्जुनेच्या जयजयकाराने वातावरण मंगलमय बनले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित राज्यातील ७५ नद्यांच्या परिक्रमेचा उपक्रम राज्य शासनाने लोकसहभागातून हाती घेतला आहे. या अनुषंगाने राज्यात ७५ नद्यांचे संवर्धन करणे, नद्या समजून घेणे, नद्यांची जपणूक कशी करावी याचे मार्गदर्शन करण्यासाठी शासन ‘चला नदीला जाणुया’ अभियान राज्यभर राबवत आहे. त्याला ठिकठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
या अभियानात राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीचा देखील समावेश आहे. शासनाच्या अभियानात लोकसहभाग वाढावा या हेतूने अर्जुना नदी विषयी प्रबोधन करण्याच्या दृष्टीने राजापूर-लांजा नागरिक संघाने सर्वपित्री अमावास्येला नदीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला देखील मोठा प्रतिसाद मिळाला. प्रथम रायपाटण संगनाथेश्वर मंदिराजवळील अर्जुनेच्या तिरावर विधीवत पूजा करण्यात आली. दरम्यान संस्कृतीमध्ये असलेले नद्यांचे स्थान महत्व यावर संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, पर्यटन विकासचे अभ्यासक विजय व्हटकर,खापणे महाविद्यालयाचे प्रा. विकास पाटील, रेवणसिध्द् मठ रायपाटणचे श्री रवीशंकर शिवाचार्य महाराज यांनी विषद केले.
कार्यक्रमाला रायपाटणचे सरपंच महेंद्र गांगण, पाचलचे माजी उपसरपंच किशोर नारकर, तळवडेच्या सरपंच गायत्री साळवी, माय राजापूरचे जगदीश पवार, मंगेश चव्हाण, दीपक नागवेकर, ग्रा.पं.सदस्य निलेश चांदे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी नदीपात्राचे पावित्र्य राखू अशी शपथ उपस्थितांनी घेतली. कार्यक्रम दरम्याने नदीच्या काठावर आरती सोहोळा संपन्न झाला. श्रध्दाभावाने नदीला ओवाळण्यात आले त्यानंतर अर्जुनेच्या पात्रात दिवे सोडण्यात आले. ते दृष्य नयनरम्य होते. अर्जुनेच्या जयजयकाराने नदीचा घाट दुमदुमून गेला होता.