सरकारकडून भूलथापा मारल्या जात आहेत, हे स्थानिक लोकांमध्ये जाऊन सांगा. योजनांच्या अंमलबजावणीबाबत येणारे कटू अनुभव सांगा जेणेकरून वास्तव जनतेपर्यंत पोचेल. मोठा खर्च करून शासन आपल्या दारीचे कार्यक्रम केले जात आहेत; मात्र त्यानंतर आवश्यक माहिती किंवा कागदपत्रे लोकांना मिळत नाहीत. कार्यक्रमापुरतेच शासन अशी स्थिती असल्याचा हल्लाबोल करण्यात आला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व संगमेश्वरचे तालुका संघटक संतोष थेराडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कडवई जिल्हा परिषद गटातील तुरळ (संगमेश्वर) येथे होऊ द्या चर्चा, कार्यक्रम घेण्यात आला.
नागरिकांनी शासनाच्या विरोधात आक्रोश करतानाच मतदानाद्वारे घडा शिकवण्याचा निर्धार केला. या वेळी शासनाच्या बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड करण्यात आला. त्यामध्ये बंद होत असलेल्या जिल्हा परिषद शाळा, कंत्राटी शिक्षक भरती, सरकार आपल्या दारी सांगून कोणत्याही गोष्टी निर्धारित वेळेत न मिळणे आणि त्यातून सर्वसामान्यांना होणारा त्रास, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, वाढती बेरोजगारी आणि फसव्या योजना यांचा पाढाच वाचण्यात आला. कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, विधानसभा संघटक रोहन बने, महिला जिल्हा संघटक वेदा फडके, महिला उपजिल्हा संघटक ऐश्वर्या घोसाळकर, महिला संपर्कप्रमुख खेडेकर, स्वाती देवळेकर आदी उपस्थित होते. थेराडे यांनी शिवसैनिकांना भविष्यातील निवडणुकांसाठी सज्ज राहा, असे आवाहन केले