महामार्गावरील मुंबई – गोवा परशुराम घाट दि. २५ एप्रिल ते १० मे पर्यंत दररोज ५ तास वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या दरम्यान घाटातील अवघड भागातील चौपदरीकरण व भरावाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. कल्याण टोल कंपनीमार्फत हे काम सुरू असून अवजड वाहने महामार्गाच्या दुतर्फा ५ तास खोळंबून राहात आहेत. याशिवाय या कालावधीत जिल्ह्यातील शेकडो एस.टी. फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून पावसाळ्यापूर्वी परशुराम घाटातील एक लेन वाहतुकीसाठी सुरू होईल, असा विश्वास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.पावसाळ्यापूर्वी परशुराम घाटातील चौपदरीकरण पूर्ण व्हावे यासाठी प्रशासनासह संबंधित ठेकेदार कंपनीने कंबर कसली आहे. मंगळवार दि. २५ पासून दुपारी १२ वाजल्यापासून या कामाला प्रारंभ झाला असून संरक्षक भिंतीच्या लगत असणाऱ्या रस्त्यावर भराव केला जात आहे तर सायंकाळी ५ वाजल्यानंतर वरच्या बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. दिवसा ५ तास युद्धपातळीवर काम केले जाणार आहे. सायंकाळी ५वा. ते दुपारी १२ वा. पर्यंत परशुराम घाट वाहतुकीसाठी खुला असून या दरम्यान खोळंबलेली अवजड वाहतूक सोडण्यात येणार आहे. तर छोट्या वाहनांना आंबडस- चिरणीमार्गे पर्यायी रस्ता उपलब्ध असून या मार्गावरून २४ तास वाहतूक सुरू राहणार आहे. पुढील १५ दिवस लोटे औद्योगिक

वसाहतीमधील कामगारांना मात्र परशुराम घाटबंदीचा फटका बसणार असून त्यांना आंबडस- चिरणी मार्गे वळसा पडणार आहे. दुपार सत्रातील वाहनांना आंबडस- चिरणी मार्गे जावे लागणार आहे. शिवाय परशुराम ग्राम स्थांनादेखील यामुळे वळसा पडणार आहे. मात्र, १५ दिवसांत हे काम पूर्ण करण्याचा संकल्प संबंधित कंपनीने केला असून पावसाळ्यापूर्वी संरक्षक भिंतीलगतची एक लेन वाहतुकीस खुली होईल. पावसाळ्यात हीच लेन वाहतुकीसाठी सुरू राहील, असा विश्वास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.९०० मीटरचे अवघड काम युद्धपातळीवर मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट दिवसातील पाच तास बंद ठेवल्याने चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. या घाटातील जुन्या रस्त्यावर भराव टाकून बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या आठ दिवसांत घाटातील धोकादायक ठरलेल्या ठिकाणी सपाटीकरणाचे काम पूर्ण करून तातडीने काँक्रिटीकरणाच्या कामालाही सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्याआधी घाटातील काम पूर्ण करून दोन्ही लेनवर वाहने सुसाट जाण्याची शक्यता आहे. परशुराम घाटातील धोकादायक स्थितीत असलेल्या ५०० मीटर अंतरातील डोंगर कटाई व संरक्षण भिंतीस भराव करण्यासाठी २५ एप्रिल ते १० मे दरम्यान घाटातील वाहतूक दुपारी १२ ते सायंकाळी ५ दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार मंगळवारपासून पोलिस बंदोबस्तात घाट बंद ठेवून कामाला सुरुवात केली आहे.