रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी श्री. खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळवून देऊ, असा विश्वास श्री. खेडेकर यांनी यावेळी बोलून दाखविला. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सह अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माजी आ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, केदार साठे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी समर्पित मोदी सरकार आणि महायुती सरकार जोमाने काम करत आहे. दोन आश्वासक नेतृत्वावर विश्वास ठेवत सर्वसमावेशक विकासासाठी एक धडाडीचा कार्यकर्ता आणि मित्रत्व जपणारे वैभव खेडेकर यांचा भाजपा प्रवेश ही आनंदाची बाब आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपाला कोकणात बळ मिळणार असल्याचेही ते म्हणाले.
झोकून काम करणार! – पक्षप्रवेशावेळी वैभव खेडेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर विश्वास असल्याने परिसर विकासासाठी भाजपामध्ये प्रवेश करत आहे. भाजपा संघटना वाढीसाठी झोकून देऊन काम्, करेन. जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या साथीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली
अखेर प्रवेश झाला – खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा चार जिल्हा अध्यक्षांसह भाजपात प्रवेश झाला. भाजपा प्रदेश कार्यालयात प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी माजी आमदार विनय नातू उपस्थित होते. या प्रवेशामुळे खेड तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये भारी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – या प्रवेश सोहळ्याला भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि जल्लोष करत स्वागत केले. संपूर्ण खेड परिसरात या प्रवेशाची चर्चा रंगली असून, राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. वैभव खेडेकर यांच्याबरोबर भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये सुबोध जाधव, संतोष नलावडे, सुरेश सावंत, विलास जाधव, मनिष खवळे, मिलिंद नांदगांवकर, संजय आखाडे, रहीम सहीबोले आदींचा समावेश आहे.

