मार्च महिना लागला की डोंगर माथ्यावरील वाड्या वस्त्यामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाचे टँकर धावू लागतात. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पाणी योजना राबवूनही टँकरमुक्तीच्या घोषणा फोल ठरत आहेत. दिवसेंदिवस उन्हाळ्यात टँकरची संख्या कमी होण्याऐवजी ती दिवसेंदिवस वाढतच आहे. केवळ शासकीय योजना राबवायची म्हणून कामे केली जातात, मात्र त्याचा उपयोग न होता अशा योजना निकामी ठरतात. अशा योजनांना कंटाळलेल्या ग्रामस्थांना उद्योजक रमेश चव्हाण हे स्वःखर्चाने गेली सहा वर्षे उन्हाळ्यातील चार महिने टँकरने पाणीपुरवठा करीत आहेत. चोरद नदी पात्रातून टँकरने हा पाणीपुरवठा करण्यात येत होता, परंतु यावर्षी मात्र मार्च महिन्याच्या सुरवातीलाच रमेश चव्हाण यांनी हा पाणीपुरवठा स्वतःच्या जागेतून करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी डोंगरावरील आपल्याच पडीक जागेत मोठा तलावासारखा खड्डा खणून त्यामध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी खड्याच्या एका बाजूला पंचवीस फूट उंचीची आणि शंभर फूट लांबीची क्रॉक्रिटची भिंत उभारली.
ही भिंत उभारण्यासाठी त्यांना खूप मोठी पदरमोड करावी लागली, परंतु केवळ सामाजिक भान ठेवत त्यांनी तहानलेल्याची तहान भागवण्यासाठी ही पदरमोड केली आहे. या खड्डयात गतवर्षीच्या पावसाळ्यात चांगला पाणीसाठा झाला. तेच पाणी पंपाच्या साह्याने यावर्षी त्यांनी बांधलेल्या सुमारे पावणेदोन लाख लिटरच्या टाकीत पंपाच्या साह्याने साठविण्यात आले. तेथून लगतच असलेल्या सुमारे दोन गावांतील १० वाड्यांना सायफन पद्धतीच्या साह्याने नळ जोडण्या दिल्या. यासाठी ग्रामस्थांकडून एकही रुपया न घेता हा लाखो रुपयांचा खर्च चव्हाण यांनी स्वतः हा करावयाचे ठरविले. यासाठी त्यांची आई (कै.) भार्गिथी बाबू चव्हाण यांचे संस्कार उपयोगी पडल्याचे रमेश चव्हाण यांनी सांगितले.
हे काम करताना त्यांनी पावसाचे साठवलेले, पाणी उंच डोंगरात बांधलेल्या पावणे दोन लाख लिटरच्या टाकीत सोडले आहे. ही टाकी बांधण्यासाठी त्यांना सुमारे साडेसात लाखांचा खर्च आला आहे. त्या टाकीतून आजूबाजूच्या वाड्यावस्त्यावर सुमारे चार किमीची पाईपलाईन फिरवण्यात आली असून यामुळे दरवर्षी पाणीटंचाईच्या काळात ग्रामस्थांना चव्हाण यांनी उभारलेल्या या जलकुंभामधून पाणीपुरवठा होत आहे.