उधाणाच्या पहिल्याचं दणक्याने मिऱ्या बंधाऱ्याचे टेट्रॉपॉट सरकू लागल्याने या कामाच्या मजबूतीबाबत ग्रामस्थांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. समुद्रात भरतीच्यावेळी उसळणाऱ्या लाटांची तीव्रता पाहता नव्याने उभारला जाणारा बंधारा येथील ग्रामस्थांना सुखरुप ठेवेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सुमारे १६० कोटी रुपये खर्च करुन मिऱ्या ते मुरुगवाडा परिसरात हा साडेतीन कि. मी. लांबचा रस्ता बांधण्यात येत आहे. ना. उदय सामंत यांनी या बंधाऱ्यासाठी प्रयत्न केले होते. मोनार्च कन्सल्टन्सी या बंधारासाठी कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. या बंधाऱ्याचे सुमारे दीड कि. मी. पर्यंतचे काम होत आले आहे. पावसाळ्यात धोकादायक भाग होता त्याचे काम टेट्रॉपॉट टाकून करण्यात आले आहे. मात्र पहिल्याच उधाणाच्या दणक्याने हे टेट्रॉपॉट काहीशे सरकले आहेत. यामुळे ग्रामस्थांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे.
दरम्यान मोनार्च कन्सल्टन्सीचे जालिंदर मोहिते यांनी मिऱ्या बंधाऱ्याचे काम योग्य प्रकारे झाल्याचा दावा केला आहे. पावसाळ्यात हा बंधारा पूर्णत: गावाला सुरक्षितता देईल, असेही त्यांनी म्हटले आहे. या बंधाऱ्याचे काम करताना खोदाईच्यावेळी कठीण दगड लागल्याने जीओटेक्साईलचा थर टाकण्याची गरज लागली नाही. केंद्रीय उर्जा व जल विभागाच्या निर्देशानुसार हे काम केले गेले आहे. अंदाजपत्रकात उपाययोजनाही देण्यात आलेल्या. आहेत. त्यानुसार काम केले जातं आहे, असे ते म्हणाले. समुद्राच्या लाटांची तीव्रता वाढल्यास आणि वाळू सररु लागल्यास टेट्रॉपॉटला स्थिरता मिळाली नाही तर ते सरकू शकतात, असे असेल तर त्याला जबाबदार कोण? असा ग्रामस्थांच्या मनात सवाल आहे. पहिलाच दणका सहन झाला नाही तर पुढे काय होणार? असाही प्रश्न ग्रामस्थ करत आहेत.