कोकणातील विविध भागांमध्ये पूर्वापार सांकेतिक भाषा वापरून अनेक कातळशिल्प रेखाटलेली समोर आली आहेत. २६ मार्चपासून थिबा पॅलेस येथे पर्यटन संचालनालय, प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग, निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या कातळशिल्प पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांच्या हस्ते झाले.
त्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना ते म्हणाले, कातळशिल्प या संकल्पनेचे महत्व ओळखून आणि त्याची समाजामध्ये आगळी वेगळी ओळख निर्माण दिल्यास कोकणाचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यास मदत होऊन त्याचे अर्थाजनामध्ये रुपांतर होईल. आणि या माध्यमातून कातळशिल्प असलेल्या भागांचा सर्वांगीण विकास होऊन तेथील गावांचा कायापालाट झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी येथे व्यक्त केला.
यावेळी इन्फिगो आय केअरचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर, नालंदा विद्यापीठाचे प्रा. डॉ. पधान, डॉ. सुरेंद्र ठाकूर-देसाई, माहिती व जनसंपर्क विभागातील निवृत्त उपसंचालक सतीश लळीत, रत्नागिरी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, उपाध्यक्ष उदय लोध, सुधीर रिसबुड आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हयामध्ये १६०० पेक्षा जास्त असलेल्या कातळशिल्पाचा योग्य अभ्यास करुन त्याचे महत्व लोकांपर्यंत पोहचविले तर येथील पर्यटनाला अधिक चालना मिळून येथील गावांचा अर्थिकदृट्या विकास होऊन त्यांचा कायापालाट होईल. येथील तरुणांना रोजगारांसाठी बाहेर जावे लागणार नाही. गावातीलच ऐतिहासिक ठेव्याचे जतन होऊन स्थानिक स्तरावर रोजगार देखील प्राप्त होईल.
पुढे बोलताना ते म्हणाले, कातळशिल्प पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून कोकणाचा वारसा, संस्कृती, वैविध्यता, ऐतिहासिक वारसा आणि महत्व जगापर्यंत पोहोचविण्याचा एक अचूक प्रयत्न करण्यात आला आहे. कातळशिल्पे, खाद्यसंस्कृती आणि कोकणची खेळे नमन यांचे एकत्रित रोल मॉडेल बनवून ज्या गावात कातळशिल्प आहेत, त्या गावांनी पुढाकार घेतल्यास जिल्हा समृद्ध होण्यास नक्कीच मदत होईल, असा ठाम विश्वास जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी व्यक्त केला.