गणेशोत्सवासाठी कोकण मार्गावर चालवण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ अनारक्षित विशेष गाडीच्या २४ डब्यांपैकी १० डबे ठाणे रेल्वे स्थानकासाठी राखीव ठेवावेत, अशा मागणीचे निवेदन जल फाउंडेशन कोकण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकांना दिले आहे. ठाणे स्थानकातून प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांची गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय तातडीने घ्यावा, असे साकडेही घातले आहे. या गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण खुले होताच काही मिनिटातच हाऊसफुल्ल होत असल्याने चाकरमान्यांच्या पदरी निराशा पडते.
गणेशोत्सवात कोकण मार्गावरून धावणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांना होणारी गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी मध्यरेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस कुडाळ अनारक्षित स्पेशल गाडीची घोषणा केली आहे. ०११८५ क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ अनारक्षित गणपती स्पेशल १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान सोमवार, बुधवार व शनिवारी धावणार लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १२.४५ वा. सुटून सकाळी ११.३० वा. कुडाळला पोहचणार आहे. या अनारक्षित स्पेशलला २४ डबे जोडण्यात येणार आहेत.
घाटकोपर, भांडूप, मुलुंड, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या भागातून प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांची संख्या लक्षणीय आहे. या भागातील चाकरमानी गावी येण्यासाठी ठाणे स्थानकातून प्रवास करत असतात. गणेशोत्सवात स्पेशलला होणाऱ्या गर्दीमुळे गणेशभक्तांना बसण्यासाठी जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे. या पार्श्वभूमीवर एलटीटी-कुडाळ अनारक्षित स्पेशलच्या २४ डब्यापैकी १० डबे ठाणे स्थानकासाठी राखीव ठेवावेत व ठाणे स्थानकातच उघडले जावेत, अशी आग्रही मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.