तालुक्यातील नाचणे गावाजवळून वाहणाऱ्या काजळी नदीला पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे किनारी भागातील सोमेश्वर, काजरघाटी, पोमेंडी गावातील शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. त्यांना यंदा दिलासा मिळणार असून या ठिकाणी ७ कोटी रुपये खर्च करून १९०० मीटरचा खारभूमी बंधारा उभारण्यात येत आहे. या बंधाऱ्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे. त्यामुळे ४० हेक्टर शेतीक्षेत्र संरक्षित होईल, असे खारभूमी विभागाकडून सांगण्यात आले. नाचणे गावाजवळून वाहणाऱ्या काजळी नदीला पावसाळ्यात दरवर्षी पूर येतो. पुराचे पाणी नदीकिनारी असलेल्या सोमेश्वर, काजरघाटी, नाचणे गावातील शेतकऱ्यांना होतो. हा सर्व भाग दुबार पिकाखाली येणारा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान सोसावे लागते. कित्येक वर्षे येथील शेतकऱ्यांनी शासनदरबारी बंधारा होण्यासाठी प्रयत्न केले.
सर्व विभागाचे दरवाजे ठोठावूनही यश आले नाही; परंतु तिथे बंधारा बांधण्यासाठी खारभूमी विभागाला ७कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यानंतर पुढील प्रक्रिया राबवण्यासाठी विलंब होत होता. ही बाब भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यापुढे ग्रामस्थांनी मांडली. चव्हाण यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे हा विषय देताच राणे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत हे काम तत्काळ सुरू करा, अशा सूचना दिल्या. त्यानंतर काही दिवसातच काम सुरू झाले. यासाठी गिरीधर पटवर्धन आणि दिलीप पटवर्धन यांनी विशेष पाठपुरावा केला होता.
बंधाऱ्यामुळे होणार काय…. – तीन मीटर उंचीच्या बंधाऱ्यामुळे खाडीला येणाऱ्या भरतीचे पाणी किनाऱ्यावरील भागात थांबणार आहे. खाडीच्या बाजूने मजबुतीकरण करण्यात आल्यामुळे कितीही वेगाने पाणी आले तरीही बंधाऱ्याला धोका पोहोचणार नाही. सोमेश्वर येथे सुमारे ११४० मीटर भागात खाडीच्या बाजूने काळ्या दगडाचा भराव टाकण्यात येणार आहे. या बंधांऱ्याला चार गेट आहेत. भरतीचे पाणी बाहेर काढण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.