कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी दहीहंडीचा उत्सव संपूर्ण राज्यात मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आला. दोन वर्षानंतर काल दहीहंडीला राज्यात मोठा उत्साह दिसून आला. मात्र मुंबईत दहीहंडी फोडताना उंच थरावरून पडल्याने १५३ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी ८८ गोविंदांना उपचार करून सोडण्यात आले आहे. तर २३ गोविंदा काही प्रमाणात गंभीर जखमी झाल्याने अद्यापही विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दहीहंडीचा जोश असल्याने आणि निर्बंध उठविल्याने तरुणाई खूप जोशात होती. त्यातच दहीहंडी फोडताना अचानकपणे पाय सटकल्याने, हात सुटल्याने, थर कोसळल्याने हे गोविंदा जखमी झाले आहेत. अनेक गोविंदांना हात, पाय, तोंड, डोकं,मान, कंबर, छातीला मार लागला व ते काही प्रमाणात जखमी झाले आहेत.
दापोली तालुक्यातील पाच पंढरी गावातील दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलंय मिरवणुकीत सहभागी झालेल्या गोविंदाचा हृदयविकाराने दुर्देवी मृत्यू झाला आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पाच पंढरी गावात घडलाय. वसंत लाया चौगले असं या मृत गोविंदाचं नाव आहे.
हर्णै पाज पंढरी गावात कोळी समाजातर्फे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गावात सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. यामध्ये वसंत चौगुले सहभागी झाले होते. पण नाचत असताना अचानक त्यांच्या छातीत कळ आली. ते जमिनीवर कोसळले. त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात नेण्या आधीच त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं. संबंधित बातमी वाऱ्यासारखी पसरली. पंचक्रोशीतील गोविंदावर दुःखाचे सावट पसरले.
चौगुले यांचा मासेमारी हा व्यवसाय होता. दोन बोटींचे ते मालक होते. पण सध्या त्या नादुरुस्त आहेत. पाजपंढरी गावातील होमावळे मंडळीतले वसंत लाया चौगुले हे सक्रिय कार्यकर्ते होते. सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना अशा पद्धतीने गोविंदाचे निधन झाल्याने गावातल्या दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले.