कोरोना काळापासून रेल्वेची सेवा बंद करण्यात आली होती आणि कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यापासून रेल्वे सेवा काही नियमावली नुसार सुरु करण्यात आल्या. परंतु, त्यासोबतच अनेक महिने थांबलेले चोरीचे प्रमाण त्यानंतर अधिक प्रमाणात वाढत गेले.
मागील वर्षी १ मे २०२१ रोजी कोकण रेल्वेच्या जामनगर-तिरुनेलवेल्ली एक्स्प्रेसमधून २७ लाख ८६ हजार रुपयांच्या चोरीची मोठी घटना घडली होती. ती चोरट्यांकडून हस्तगत करून मूळ मालकाला रत्नागिरी पोलिसांनी परत केली आहे.
प्रशांत भीमराव माने ३९ वर्षे रा. मु. पो. मासोरणे, ता. खटाव, जि. सातारा यांनी याबाबतची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार तत्कालीन पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनित चौधरी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शांताराम भाऊराव महाले, पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील सर्व पोलीस अंमलदारांनी या गुन्ह्याचा तपास केला.
चोरांना अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गुन्ह्यातील चोरीस गेलेली रोख रक्कम २७ लाख ८६ हजार रुपयांची रक्कम आणि ६ आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्या कडून चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन आणि इतर साधन सामग्री पोलिसांनी हस्तगत केले होते. या गुन्ह्यातील आरोपी केरळ राज्य व सांगली, विटा येथे असल्याची पोलिसांना भनक लागली.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेऊन ४८ तासांच्या त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.पोलिसांनी ही रक्कम कोर्टात दाखल केली. कोर्टाने ही रक्कम मूळ मालकाला परत करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी प्रशांत भीमराव माने रा. सातारा यांच्या ताब्यात दिली. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते ही रक्कम देण्यात आली.