पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे राजिवडा येथील मच्छीमारांनी मांडवी बंदरातील गाळ काढून मच्छीमारांच्या नौकांसाठी चॅनेल मोकळा करुन मिळावा अशी मागणी केली होती. शहराजवळील भाट्ये खाडीच्या मुखाशी मांडवी बंदरामध्ये साचलेल्या गाळाची पत्तन विभाग, मेरीटाईम बोर्ड आणि मत्स्य खात्यांच्या अधिकाऱ्यांनी यांत्रिक बोटीने प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या ठिकाणी असलेला गाळ काढण्यासाठी अंदाजपत्रक बनविण्यात येणार असून पावसाळ्यापूर्वी याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
उदय सामंत यांच्या सूचनेनंतर मेरीटाईम बोर्ड, पत्तन विभाग आणि मत्स्य खात्याच्या अधिकार्यांनी मच्छिमार संघर्ष समितीचे पदाधिकारी नजीर वाडकर, शफी वस्ता, इमान सोलकर, युसूफ भटकर, रहिम दलाल, रफीक फणसोपकर यांच्यासह मांडवीच्या मुखाशी साचलेल्या गाळाची बोटीवरून पाहणी केली. यावेळी संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांनी गाळामुळे येणाऱ्या अडचणींबद्दल माहिती दिली. त्यानुसार पाहणी करून अधिकार्यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली.
राजिवडा, कर्ला, भाट्ये आणि फणसोप या परिसरातील मच्छीमारांच्या नौका समुद्रात जाण्यासाठी भाट्ये खाडीचे मुख असलेले मांडवी बंदर हा एकमेव मार्ग उपलब्ध आहे. परंतु, या मार्ग गाळाने भरला असल्याने, अनेकदा तेथे वाहतूक करताना दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. तसेच या मार्गात अनेक वर्षे गाळ साचून त्याचे कठीण असे खडकही तयार झाल्याने मच्छीमारांसाठी मासेमारीसाठी निघताना धोका निर्माण झाला आहे.
या गाळामुळे अनेक बोटींचे अपघात होऊन त्यामध्ये खलाशी आणि कार्माचारीही दगावले असल्याच्या घटना घडल्या असून, बोटींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हा गाळ उपसण्याची तसेच बंधारा घालण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून शासनाकडे सुरू आहे. संबंधित विभागाकडून पाहणी करण्यात आल्यामुळे मच्छीमारांना हा चॅनेल लवकरच मोकळा करून मिळेल असा विश्वास निर्माण झाला आहे.