जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील जिल्ह्यांतर्गत बदल्यांच्या सहाव्या टप्प्यातील नियुक्तांवरून शिक्षक आणि प्रशासन यांच्यामध्ये ‘तू तू-मैं मैं’ झाले. शनिवारी (ता. १) दुपारी समुपदेशन करून शिक्षकांना नियुक्ती देण्याविषयी चर्चा सुरू होती; परंतु तात्पुरत्या नियुक्तीच्या पर्यायाला शिक्षक सकारात्मक नसल्याने हा तिढा सोडवण्यासाठी शिक्षकांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे धाव घेतली आहे. जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पन्नासपेक्षा अधिक वय असलेल्या सुमारे ६४ शिक्षकांनी झालेल्या बदल्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
बदल्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षकांनी पालकमंत्र्यांना साकडे घातले होते. त्यांनी हा विषय सोडवण्याच्या सूचना जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार शनिवारी दुपारी शिक्षकांना समुपदेशनासाठी बोलावले होते. शिक्षकांची गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात कामगिरीवर शाळा देण्याची तयारी दर्शवली होती. हा पर्याय शिक्षकांकडून मान्य करण्यात आला नाही. यावरून शिक्षकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. यावेळी उपस्थित शिक्षक सकाळी शाळा आटोपल्यानंतर थेट जिल्हा परिषदेत दाखल झाले होते. प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा होती. सायंकाळपर्यंत अपेक्षित निर्णय न झाल्यामुळे अखेर उपस्थित शिक्षकांनी पुन्हा पालकमंत्र्यांकडे धाव घेतली आहे.