मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुलाची तज्ज्ञ समितीने चौकशी केल्यानंतर त्याचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सादर केला आहे. त्यानुसार दिल्ली येथे राष्ट्रीय महामार्ग विभागाची कोसळलेल्या उड्डाणपुलासंदर्भात प्राथमिक बैठक झाली. कोसळलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर काढणे आणि लाँचर काढण्याचे काम अडचणीचे असून या संदर्भात अशी कामे केलेल्या तज्ज्ञ एजन्सीची मदत घेण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून केली जात आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाशिष्ठी पुलाजवळून बहादूरशेखनाका ते प्रांत कार्यालयादरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.
उड्डाणपुलासाठी आवश्यक ते पिलर उभारल्यानंतर पुलावर गर्डर बसवण्याचे काम सुरू झाले होते. अशातच काम सुरू असताना बहादूरशेखनाका येथे उड्डाणपुलासाठी बसवलेले गर्डर आणि लाँचर कोसळले. त्यावर शासनाने तज्ज्ञ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त केली. या समितीने पाहणी केल्यानंतर त्याचा अहवाल केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सादर केला आहे. त्यानुसार प्राथमिक बैठक घेण्यात आली. उड्डाणपुलाचे गर्डर हटवणे आणि लाँचर काढण्याचे काम अत्यंत जोखमीचे आहे. त्यामुळे अशी कामे केलेल्या एजन्सीची अथवा संस्थेची मदतदेखील घेण्याचे बैठकीत ठरवण्यात आले. उड्डाणपुलाचे दोन्ही बाजूने गर्डर बसवण्याचे काम करता येते. यासाठी ईगल कंपनीने आणखी एक लाँचर आणला आहे; मात्र काम सुरू असताना जोडलेले गर्डर कोसळले.
त्यामुळे गर्डर जोडणीसाठी आणखी उच्च तंत्रज्ञानाची नियुक्ती करण्याची चाचपणीदेखील केली जात आहे. कोसळलेल्या पुलाचे गर्डर हटवण्यासाठी पुढील काही दिवसात आणखी एक संयुक्त बैठक घेतली जाणार आहे. उड्डाणपुलासंदर्भात प्राथमिक बैठक झाली तरी त्यामध्ये गर्डर हटवण्यासाठी अंतिम नियोजन झालेले नाही. उड्डाणपुलाच्या दुर्घटनेस महिनाभराचा कालावधी उलटला तरी गर्डर हटवण्यासंदर्भातील ठोस निर्णय झालेला नाही.