साताऱ्यामधील कास पठार म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. पावसाळ्यानंतर डोळ्यांचे पारणे फेडण्यासाठी अवश्य तिथे भेट द्यावी. निसर्ग, रंग आणि फुल झाडे यांनी तर विशेष करून भेट द्यावी. कास पठाराची असलेली अनेक वैशिष्ट्ये ऐकूनच अनेकांना तिथे प्रत्यक्ष जाऊन निसर्गाचा आस्वाद घ्यायला नक्कीच आवडेल आणि अशाच पर्यटकांसाठी हि नक्कीच एक आनंदाची बातमी ठरणार आहे.
कास पठार कार्यकारी समिती व वनविभाग जावळी- सातारा यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये कास पठार बुधवार पासून पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. येथे प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा केली असून ती बंधनकारक देखील केली असून, तिकीट दर १०० रुपये असणार आहे. सदरच्या बैठकीला सहायक वनसंरक्षक सुधीर सोनावले, वनक्षेत्रपाल निवृती चव्हाण, वनरक्षक नीलेश रजपूत, जावळी वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी, वनरक्षक स्नेहल शिंगारे यांच्यासह समिती सदस्य यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्राला निसर्गाची एक अभूतपूर्व देणगी लाभलेली आहे. कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत निसर्गाचे एक सुंदर वरदानच लाभलेले आहे. पावसाळ्यामधील राज्यातील अनेक ठिकाणंच सौंदर्य वाखाणण्याजोगे असते. साताऱ्यातील कास पठाकारडे सद्य स्थितीला पाहताना अशीच प्रचिती येते. असंख्य पर्यटक आणि निसर्ग प्रेमींसाठी पर्वणी असणाऱ्या कास पठारावर यावर्षीही रंगीबेरंगी विविध दुर्मिळ फुलांचा बहर आलेला दिसून येत आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यामध्ये या विविध प्रकारच्या फुलांचा बहरण्याचा मोसम असतो.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आल्यामुळे, कास पठार पर्यटकांसाठी मागील वर्षी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. अगदी त्या भागाला प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले. सप्टेंबरच्या १ तारखे दरम्यान साधारणत: हे पठार पर्यटकांसाठी खुलं केलं जातं. देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध अभ्यासक आणि पर्यटक कास पठाराला या कालावधीमध्ये आवर्जून भेट देतात.