रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडच्या शिवतर या गावात लघुपाटबंधारे योजने अंतर्गत धरण बांधण्यात येत आहे. या धरणासाठी गावातील आजी माजी सैनिकांनी आपल्या वडिलोपार्जित शेतजमिनी दिल्या आहेत. मात्र, या आजी माजी सैनिकांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देताना शासनाकडून आखडता हात घेतला जात आहे. शासकीय नियमानुसार मोबदला देताना शिवतर परिसरातील उपलब्ध अॅसलेल्या जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारांनुसार कमीतकमी ९ ते १० हजार रूपये प्रतिगुंठा दर देणे अपेक्षित असताना ४ हजार ८४५ रूपयांचा दर देऊन आजी माजी सैनिक आणि शेतकऱ्यांची बोळवण करण्याचा डाव खेडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी आखला आहे. याविरोधात स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी प्रजासत्ताक दिनीच जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत मौजे शिवतर तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी येथे धरण बांधण्याचे काम अंतिम टप्यात असून पुढील महिन्याभरात पूर्ण होईल, शिवतर गावासह पंचक्रोशीतील गावांना पिण्यासाठी तसेच शेतकी कामासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शिवतर गावातील आजी-म ाजी सैनिकांनी आपल्या वडिलोपार्जीत शेत जमिनी महाराष्ट्र शासनाला धरण, बांधण्यासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भूसंपादनाची प्रक्रिया सुरु असून यासाठी शासन परिपत्रकानुसार, १९ एप्रिल २०१९ ते १९ एप्रिल, २०२२ या तीन वर्षातील शिवतर गावातील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार ग्राह्य धरुन उपविभागीय अधिकारी कार्यालय, खेड यांच्याकडून निवाडा तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या तीन वर्षांतील दोन वर्षे कोरोनाकाळात गेली असल्याने त्याकाळात जमीन खरेदी – विक्रीचे व्यवहारच झालेले नाहीत.
उपलब्ध व्यवहारांपैकी पहिले दोन व्यवहार हे अधिकतम रकमेचे ग्राह्य धरावेत, असा शासकीय निकष असल्याने जे व्यवहार झाले आहेत; त्यांची सरासरी काढल्यास किमान ९ ते १० हजार रूपयांचा प्रतिगुंठा दर देणे क्रमप्राप्त आहे, मात्र, उपविभागीय अधिकार्यांनी याच नियमाला हरताळ फासून कमीत कमी रक्कमेच्या व्यवहारांच्या सरासरीनुसार प्रतिगुंठा फक्त ४,८४५ रूपये दर आजी माजी सैनिकांना जमिनीचा मोबदला म्हणून देण्याचा निवाडा केला असल्याचे समजते. उपविभागीय अधिकारी कार्यालय, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी यांच्या मार्फत निश्चित करण्यात आलेला दर आजी-माजी सैनिकांना, शेतकऱ्यांना मान्य नसून यामुळे आमचे मोठ्या प्रम ाणावर आर्थिक नुकसान होणार आहे. योग्य मोबदला न मिळाल्यास येत्या प्रजासत्ताक दिनी ज्या धरणासाठी जमिनी दिल्या आहेत; त्याच धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रोहिदास मोरे आणि आजी – माजी सैनिकांनी दिला आहे.