रत्नागिरी शहरातील विद्युत ग्राहकांकडून महावितरणची मोठी थकबाकी आहे. सुमारे साडेनऊ हजार ग्राहकांनी ५ कोटी ४२ लाख रुपयांच्या घरात थकबाकी पोहोचली आहे. यामध्ये घरगुती ग्राहक, वाणिज्य, औद्योगिक आणि शासकीय म्हणजे रत्नागिरी पालिका, ग्रामपंचायतीच्या स्ट्रीटलाईटचा यामध्ये समावेश आहे. रत्नागिरी महावितरणच्या जिल्ह्यातील ग्राहकांबरोबर रत्नागिरी शहरातील विद्युत ग्राहकांच्या वीजबिलाची मोठी थकबाकी असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रत्नागिरी शहरांतर्गत येणाऱ्या ९ हजार ३०० ग्राहकांकडून एकूण ५ कोटी ४२ लाख रु. महावितरणचे थकले आहेत. यामध्ये विशेषतः नगरपालिका आणि ग्रामपंचायत स्तरावरील स्ट्रीटलाईटच्या थकबाकीने मोठा आकडा गाठला आहे तर वाणिज्यक आणि औद्योगिक ग्राहकही मागे नाहीत. घरगुती ग्राहकांबरोबर शासकीय थकबाकीचे प्रमाणच अधिक आहे.
रत्नागिरी पालिकेच्या स्ट्रीटलाईटच्या बिलाची थकबाकी तब्बल २ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय शहरालगतच्या शिरगाव, मिऱ्या, नाचणे, कुवारबाव, मिरजोळे आदी ग्रामपंचायतींकडे ९५ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे महावितरण कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कोट्यवधींच्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीवर ताण येत आहे. थकीत वीजबिलाची त्वरित वसुली करण्यासाठी महावितरणकडून कठोर पावले उचलली जात आहेत. थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम युद्धपातळीवर राबवण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या रत्नागिरी कार्यालयाने दिली.
शहरात १५ हजार स्मार्ट मीटर बसवले – जिल्ह्यात स्मार्ट मीटरचा विषय गाजत आहे. अनेक ठिकाणी या मिटरला विरोध होत आहे. काही ठिकाणी विरोधामुळे काम थांबवण्यात आले होते; परंतु शहरामध्ये स्मार्ट मीटरचे काम सुरू आहे. रत्नागिरी शहरात सुमारे ५७ हजार ग्राहक आहेत. त्यापैकी आतापर्यंत १५ हजार स्मार्ट मीटर बसवले आहेत.

