राजापूर तालुक्यातील कशेळी आवळीचीवाडी येथे पाणी भरलेली भांडी उचलण्यासाठी गेलेल्या वृध्देने शेजाऱ्याला बाजूला सरक असे बोलल्याचा राग आल्याने त्याने वृध्देला मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरा नथुराम पेटावे वय ७५, या नळावर पाणी भरलेली भांडी उचलण्यासाठी गेल्या असता, त्यावळी तेथे उभ्या असलेल्या अमित महादेव पेटावे रा. कशेळी, आवळीचीवाडी, राजापूर याला इंदिरा यांनी स्वतःला जाण्यासाठी रस्ता मिळावा म्हणून बाजूला सरक असे बोलल्या. याचा त्याला अतोनात राग आल्याने, अमित याने वृद्ध महिला इंदिरा यांच्या छातीवर लाथ मारली आणि त्यांना खाली पाडले.
हे भांडण सोडवण्यासाठी तेथे सुभद्रा हिरु पेटावे रा. कशेळी, आवळीचीवाडी, राजापूर गेल्या असता, त्यावेळी रागाच्या भरात असलेल्या अमितने सुभद्रा यांच्याही तोंडावर लाथ मारली आणि त्या चिर्याच्या पाखाडीवर जाऊन उताणी पडल्या. यामध्ये त्यांच्या डोक्याला मागील बाजूला मार लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत. रागाचा पारा जास्तच चढला असल्याने, तो एवढयावरच न थांबता वृद्ध महिलेला उचलण्यासाठी हिला कोण हात लावतो ते बघतो. हात लावेल त्याला कापून टाकीन अशी धमकीही दिली. त्यामुळे परिसरामध्ये घबराट निर्माण झाली.
याबाबतची फिर्याद रेश्मा रमेश पेटावे वय ५२, रा. कशेळी, आवळीचीवाडी, राजापूर यांनी नाटे पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित अमित पेटावे याच्याविरोधात भादवि कलम ३३६,३३७,३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचा अधिक तपास नाटे पोलीस करत आहेत.