राजापूर तालुक्यातील केळवडे येथील दीपक उर्फ बाबू राजाराम गुरव याला बंदूकीची गोळी लागून झालेल्या मृत्युप्रकरणी आणखी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. विजय यशवंत जाधव वय ५७, रा. इंदवटी, ता. लांजा असे त्याचे नाव असून त्याला राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणातील प्रथम संशयित आरोपी संजय उर्फ बंड्या महादेव मुगे याला विजय जाधव याने काडतूस पुरविल्याचे पोलीस तपासात पुढे आल्याने त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तालुक्यातील केळवडे येथे बंदूकीची गोळी लागून दीपक उर्फ बाबू राजाराम गुरव याचा मृत्यु ओढावला, या प्रकरणी राजापूर पोलीसांनी केळवडे गावातील संजय उर्फ बंड्या महादेव मुगे याला अटक केली असून संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
मुगे याला १४ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुगे याच्याकडील बंदूक व काडतूसे जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलिस तपासा दरम्यान संशयित आरोपी संजय मुगे याने वापरेलेली व त्याच्याकडे असलेली काडतूसे ही इंदवटी लांजा येथून विजय जाधव याच्याकडून घेतल्याची माहिती तपासात पोलिसांना दिली.
जाधव याच्याकडून आपण २० काडतूसे घेतल्याची माहिती मुगे याने पोलिसांना दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ इंदवटी-लांजा येथून विजय जाधव याला ताब्यात घेतले व त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ पर्यंत पोलिस कोठडी दिल्याची माहिती परबकर यांनी दिली आहे.