28.5 C
Ratnagiri
Sunday, September 7, 2025
HomeRatnagiriउद्यापासून कडक लॉकडाऊन – जिल्हाधिकारी

उद्यापासून कडक लॉकडाऊन – जिल्हाधिकारी

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, ३१ मे पर्यंत असणारा लॉकडाऊन अजून ७ दिवस आणि तोही कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्हा कोरोना रुग्ण वाढीमध्ये दुसर्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पुढील साधारण ७ दिवस कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत व्यापारी वर्गामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. परंतु, कोरोनाचे एवढे वाढीव प्रमाण पाहून आणखी काही दिवस कडक लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. या लॉकडाऊन मध्ये दुध सेवा सकाळी ११ वाजेपर्यंत करण्याची परवानगी दिली गेली आहे. खाद्य पदार्थांची होम डिलिव्हरी बंद करण्यात आली आहे. तसेच या लॉकडाऊन मध्ये किराणा मालाची दुकाने, भाजीपाला, फळ विक्री, मच्छी मार्केट, चिकन, मटणची दुकाने इत्यादी सर्व आस्थापन बंद ठेवण्यात येणार आहेत.

एमआयडीसीमधील फायबर आणि प्लास्टिक निर्मितीवर आधारित उद्योग ४०टक्के तरी बंद ठेवण्यात येणार आहेत. शेतीचा हंगाम सुरु होत असल्याने शेतकर्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जाव लागू नये म्हणून बँका, वित्तीय संस्था, ठराविक कालावधीपर्यंत सुरु राहणार असून त्यामध्ये फक्त कृषी विषयक सेवाच सुरु राहणार आहेत.

रत्नागिरी मध्ये येण्याच्या सर्व सीमा बंद केल्या गेल्या असून, कोणत्याही रेड झोन मधील जिल्ह्यामधून येणार्यांना सुद्धा विशेष निर्बंधित नियमावली आखून दिलेली आहे. त्यामध्ये ४२ तास आधी केलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह अहवाल असणे गरजेचे आहे. त्याशिवाय जिल्ह्यामध्ये कोणालाही परवानगी दिली जाणार नाही. तसेच जिल्ह्यात होणारे विवाह सोहळे, त्याच्यावर सुद्धा विशेष नजर ठेवण्यात येणार आहे. विवाह सोहळ्याला २५ जणांची उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे आणि तेही कोरोना निर्बंध पाळून. लग्न समारंभात सामील होणाऱ्यांची सुद्धा कोविड टेस्ट करण्यात येणार आहे, तसेच या विवाह सोहळ्यांवर नजर ठेवण्यासाठी १ पोलीस, १ तलाठी आणि १ व्डीहिओग्राफरची नेमणूक करण्यात आलेली आहे. जेणेकरून कोरोना निर्बंधांचा बोजवारा उडणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular