राज्यातील श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहिहंडी उत्सवाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आखून दिलेले निर्बंध पाळून सुरक्षितपणे साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा देताना एक सूचक इशारा सुद्धा दिला आहे, भगवान श्रीकृष्णांनी समाजातील अपप्रवृत्तींचा विनाश करण्यासाठी जन्म घेतला. समाजामध्ये विनाशकारी असणारी गोष्ट नष्ट करण्याचं काम भगवान श्रीकृष्णांनी केल आहे. आजच्या काळात विनाशकारी कोरोनाला संपवण्याचा संकल्प आपण या श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्तानं करुया आणि वाईट विचारांना स्वतःमधून नष्ट करण्याची सुरुवात करूया.
श्रीकृष्ण जन्माष्टमी दरवर्षी मोठ्या गाजवाजात साजरी केली जाते, त्यानंतरचा येणारा दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात जोशात साजरा केला जातो. बाळगोपाळांचा हा उत्साह, आनंद आपल्यालाही सुखावतो. परंतु मागील वर्षापासून सुरु असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आपण सर्वच सण अतिशय साधेपणाने साजरे केले आहेत. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी देखील साधेपणाने घरीच साजरी करावी. दहीहंडी उत्सव साजरा करू नये.
महाराष्ट्रात गोपाळकाला, नंतर गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी हे सण पाठोपाठ येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सण साजरे करताना सावधगिरी बाळगावी. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना सणांमध्ये काळजी न घेतल्यास पुन्हा निर्बंध लावू असा सज्जड इशाराच दिला आहे.
रत्नागिरीमधील प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री विठ्ठल मंदिर येथे गोकुळाष्टमी दहीकाला उत्सव शासनाचे आदेश पाळून अत्यंत साध्या स्वरूपामध्ये मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे विठ्ठल मंदिर संस्थेच्या वतीने निघणाऱ्या दहिकाला मिरवणुकीत गोविंदा बाजारपेठेत दहीहंडी फोडणार नाहीत. श्री विठ्ठल मंदिर संस्थेच्या धार्मिक कार्यक्रमात रुढी, परंपरेप्रमाणे कोणताही बदल होणार नाही, असे सचिव विजय पेडणेकर आणि कोषाध्यक्ष प्रमोद रेडीज यांनी सांगितले.