शहरातील बाजारपेठेत शिवनदी पुलाजवळ भररस्त्यात रात्रीच्यावेळी आलेल्या अजस्त्र मगरीच्या मुक्त संचारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात शहरातील नागरिकांनी काल वनविभागाला पत्र देऊन मगरींपासून नागरिकांना भयमुक्त करावे, असे पत्र दिले आहे. मगरींचा अधिवास असलेल्या शिवनदीत पुलाजवळच्या दोन्ही बाजूस संरक्षक जाळी बसवण्यात यावी, असे पत्र वनविभागाने चिपळूण पालिकेला पाठवले आहे. शहरातील माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, कैसर देसाई, समीर कोवळे, संतोष चोगले, निखिल पवार, अभिषेक कदम यांनी विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांना निवेदन दिले.
यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, चिपळूण शहर परिसरामधे शिवनदी व वाशिष्ठी नदी अशा दोन नद्या आहेत. या नद्यांमधून गेल्या काही वर्षात मगरींचे वास्तव्य व वृद्धी होत आहे. या मगरी अनेकदा नदीच्या काठावर येतात तसेच आता तर भररस्त्यावर देखील फिरू लागल्या आहेत. या अगोदर विविध वस्त्यांमधेही त्या आलेल्या आढळल्या आहेत. या प्रकारांमुळे नागरिक भयभीत आहेत. विषेशतः रात्री-अपरात्री रस्त्यांवर फिरणे, वावरणे धोकादायक झाले आहे. शासनातर्फे या भितीदायक प्रकारांवर निश्चितच प्रतिबंध करणे आवश्यक आहे. आपण आपल्या खात्यातर्फे या मगरीचा त्वरित बंदोबस्त करावा व आम्हा नागरिकांना मगरींपासून भयमुक करावे.
पावसाळा सुरू झाला आहे. आता तर पुराचाही धोका असतो. अशा पुरातून या मगरी हमखास रस्त्यावर येतात. त्यामुळेही धोका आहे. शहरातील विविध तलाव, नाल्यांमधूनही त्यांचा वावर आहे. त्यामुळे याबाबत गांभीर्याने निर्णय घ्यावा अन्यथा आम्हा नागरिकांना आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे.
वनविभागाचे आवाहन – चिपळूण वनविभागाचे बचाव पथक सुसज्ज यंत्रणेसह तयार असते याशिवाय वनविभागाचा स्वतंत्र टोल फ्री क्र. १९२६ हा असून, मगर अथवा इतर वन्यप्राणी लोकवस्तींमध्ये आल्याबाबत आपत्कालीन कक्षास, वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.