गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तालुक्यामध्ये जनावरांना होणाऱ्या लम्पी आजाराने डोके वर काढले. त्यामध्ये अनेक गावांमधील २४१ जनावरांना लम्पीचा संसर्ग झाल्याची माहिती पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. किनरे यांनी दिली. लम्पी आजाराला रोखण्यात पशुसंवर्धन विभागाला यश आले असून, आजारी असलेल्या जनावरांपैकी ६१ जनावरे पूर्ण बरी झाली आहेत. १५८ ‘जनावरांच्या तब्येतीमध्ये प्रगती आहे. २२ जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती त्यांनी दिली.
लम्पीच्या संसगनि मृत्युमुखी पडलेल्या २२ पैकी २१ जनावरांच्या मालकांना शासनाकडून नुकसानीचे अनुदान प्राप्तीसाठीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याचेही डॉ. किनरे यांनी सांगितले. तालुक्यामध्ये जनावरांचे लसीकरणाचे काम पूर्ण झाले असून, लम्पी आजाराला आटोक्यात आणणारी औषधे पंचायत समितीच्या सेस फंडातून खरेदी करण्यात आली. पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ही औषधे उपलब्ध असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
दरम्यान, लम्पी आजाराचा संसर्ग होऊन मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना शासनाकडून नुकसान भरपाईपोटी साहाय्य म्हणून अनुदान दिले जात आहे. त्यामध्ये गायीला ३० हजार, बैलाला २५ हजार आणि लहान वासराला १६ हजार रुपये अनुदानाचा समावेश आहे. लम्पी आजाराचा संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या २२ पैकी २१ जनावरांच्या मालकांना अनुदान प्राप्तीसाठी पशुसंवर्धन विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती डॉ. किनरे यांनी दिली.