पाऊस, उन्ह, वादळ काहीही असेले तरी महावितरण विभागाची कायमच सेवा कार्यरत असते. कोणताही ऋतू असला तरी त्यांना सुट्टी नसते. तोक्ते वादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे कित्येक गावामध्ये विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. आठवडा सरला तरी काही भागामध्ये अजूनही वीज पोहोचलेली नाही. महावितरणाचे कर्मचारी दिवस रात्र मेहनत घेऊन वीजभार नियंत्रित करण्याचे काम करताना दिसत आहेत. आणि काही प्रमाणात त्यांना यश सुद्धा मिळाल्याचे समोर आले आहे.
महावितरण कंपनीला तोक्ते वादळामुळे चांगलाच फटका बसला आहे. वाऱ्याच्या अफाट वेगामुळे मोठ्या प्रमाणात वीजेचे खांब, विद्युतवाहिन्या यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण पावणे सहा लाखाच्या आसपास विद्युत कनेक्शन्स असून त्यापैकी साडे पाच लाखांपर्यंत विद्युत जोडणीतील बिघाड दुरुस्त करण्यात महावितरणाला यश मिळाले असून, अगदी लहान खेडेगावापासून ते शहरापर्यंत महावितरणाचे कर्मचारी अहोरात्र दुरुस्त्या करण्यात व्यग्र असलेले दिसत आहेत.
जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले असल्याने कोविड रुग्णालयांना सुद्धा या वादळाचा आणि विजेच्या अनियमिततेचा काहीशा प्रमाणात दणका बसला आहे. परंतु, कोविड रुग्णालयांची गरज लक्षात घेऊन रुग्णालय आणि रुग्णांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून महावितरणाचे अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणावर उपस्थित राहून वेळेमध्ये वीज पुरवठा आवश्यक त्या वेगावर नियंत्रित करून घेत आहेत. कोकण किनारपट्टीवर झालेल्या नुकसानीसाठी कोल्हापूर, सोलापूर, इत्यादी ठिकाणाहून महावितरणाची पथके मदतीसाठी दाखल झाली असून, आवश्यक तेवढा साहित्यांचा पुरवठा शासनाने केला आहे. त्यामुळे महावितरणाचे कर्मचारी संपूर्ण जिल्हा प्रकाशमान करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. महावितरणाच्या या कामगिरीमुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा सर्व कसोसीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.