कोकणामधील प्रमुख व्यवसायापैकी एक असलेला मत्स्य व्यवसाय आहे. आज पासून पावसाळी मासेमारीवर बंदी घालण्यात आलीआहे. हा काळ माश्यांचा प्रजोत्पादनाचा काळ असल्याने साधारण पावसाळ्यातील अति तीव्रतेचे २ पावसाचे महिने तरी कोकणामध्ये मासेमारी बंद असते. पण सध्या सगळीकडे लॉकडाऊन असल्याने आणि मागील महिन्यात आलेल्या वादळांमुळे मच्छी व्यावसायिकांनी नौका आधीच किनाऱ्यावर आणून ठेवल्या आहेत. तौक्ते वादळाचा फटका किनाऱ्यावर उभ्या असलेल्या नौकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला होता, खूप मोठ्या प्रमाणातल्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे तौक्ते चक्रीवादळाचा संभाव्य धोक्याची कल्पना दिल्यानंतर ते वादळ येऊन गेल्यावर सुद्धा बर्याचशा नौका पुन्हा समुद्रामध्ये मासेमारी साठी न नेता किनार्यावरच होत्या.
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदर मत्स्य व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. या बंदरामध्ये साधारण ८५० परवानाधारक मच्छीमार बोटी उभ्या असतात. जून आणि जुलै महिन्यामध्ये मासेमारी पूर्णपणे बंद असते. त्यामध्ये मच्छी व्यापारी नौका किनाऱ्यावर ओढून घेऊन पावसाच्या पाण्यापासून संरक्षित राहाव्या म्हणून प्लास्टिक अथवा ताडपत्रीने त्या शाकारून ठेवतात. पावसाळ्यामध्ये काही मच्छीमार शासनाच्या कायद्याचे पालन न करता मासेमारीसाठी समुद्रात जातात, परंतु, पाऊस आणि वार्यासारख्या नैसर्गिक गोष्टींचा मच्छीमार्याना त्रास होऊ शकतो तसेच माशांच्या प्रजननाचा काळ त्यामुळे मासेमारीवर बंदी घालण्यात येते याकडे ते दुर्लक्ष करतात.
मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी १ जून ते ३१ जुलै २०२१ या कालावधीमध्ये राज्यामध्ये यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली असल्याचा आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने काढला असल्याचे सांगितले आहे.