शासनाचा आदेश मोडून आदेश मोडून जिंदाल कंपनीने गॅस टर्मिनलचे काम सुरु केल्याचे कळताच परिसरातील शेतकऱ्यांनी / ग्रामस्थांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत हे काम बंद पाडले. गावकऱ्यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. याबाबत अधिक वृत्त असे की, जयगड परिसरात गॅस टर्मिनल उभारण्यास परिसरातील ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. लोकवस्तीजवळ गॅस टमिनल उभारु नये अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. असे असतानाही या गॅस टर्मिनलचे काम सुरु झाल्याचे ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी काम बंद पाडले. त्यानंतर याबाबतचा विचारण्यासाठी जाब कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावले. या कामाशी आमचा काही संबंध नाही असे संबंधित अधिकाऱ्यांनी जाब विचारणाऱ्या ग्रामस्थांना सांगितले. यावरुन बरीच वादावादी झाली.. गावाकऱ्यांनी याबाबत स्थानिक पोलीस स्थानक व महाराष्ट्र सागरी मंडळ जयगड येथे व्रकार नोंदवली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई यांनी गॅस टर्मिनस चे काम तात्काळ थांबवले आहे. तरी देखील बुधवारी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काम सुरु करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ग्रामस्थ संतापले. स्थानिक लोकांचा विरोध असताना, शासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी नसताना जिंदाल कंपनी मनमानी करून नांदिवडेच्या माथ्यावर वर लोकवस्तीमध्ये गॅस टर्मिनल उभारत आहे. आधीच कोळशाची धूळ आणि राख याचा स्थानिक लोकांना खूप त्रास होत आहे. श्वसनाच्या वाटे कोळशाची धूळ व राख याने लोक आजारग्रस्त झालेले आहेत. मात्र त्याचा कोणताही विचार न करता अशा पद्धतीने गॅस’ टर्मिनल उभारण्याचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. शासनाने या सर्व गोष्टीची दखल घेत लवकरात लवकर गॅस टर्मिनल लोकवस्तीतून स्थलांतर करावा आणि कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि मच्छीमारांनी केली आहे.