मुंबई-गोवा महामार्गाचे तालुक्यामध्ये वाटूळ ते तळगाव असे सुमारे ३७ किमीचे चौपदरीकरणाचे काम करण्यात येत आहे. त्यापैकी सुमारे नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे. या महामार्गावरील सर्वाधिक उंचीचा पूलही वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मात्र, काही ठिकाणी काही जमीनमालकांना जमिनीचा मोबदला न मिळाल्याने हे काम ठप्प आहे. जोपर्यंत आम्हाला आमच्या जागेचा मोबदला मिळत नाही, तोपर्यंत काम करू नये, अशी भूमिका या जमीन मालकांची आहे.
राजापूर एसटी डेपोसमोरून मुंबई-गोवा महामार्ग जात असून एसटी डेपोसमोर गाड्यांमधून उतरणारे आणि विविध गावांमध्ये जाण्यासाठी गाड्या पकडणारे मोठ्या संख्येने प्रवाशी थांबलेले असतात. मात्र या ठिकाणी प्रवासी निवारा शेड नसल्याने प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागत आहे. महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम करताना गावोगावी प्रवासी निवारा शेड उभारल्या जात असताना आवश्यकता असलेल्या एसटी डेपोसमोर प्रवासी निवारा शेड उभारण्याचे कोणतेही लक्षण दिसत नाही.
शासनाकडून योग्य तो तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत. मात्र, डेपोसमोरचा रस्ता भुयारी मार्ग की जंक्शन याच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून रखडला आहे. मात्र, त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पावसाळा थांबल्याने रखडलेल्या या रस्त्याचे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, सद्यःस्थितीमध्ये तशा कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे रखडलेले काम नेमके कधी सुरू होणार, याबाबत अनिश्चितता आहे.
एकीकडे काम पूर्ण होते कि नाही याबाबत अनिश्चितता तर दुसऱ्या बाजूला महामार्गावरून प्रवास करणाऱ्या गाड्या पकडण्यासाठी प्रवाशांना रखरखत्या ऊनामध्ये किंवा कधीकधी अवकाळी पावसाचा मारा देखील सहन करत तासनतास ताटकळत राहावे लागत आहे.