मागील महिनाभर झालेली राजकारणातील उलथापालथ आणि स्थापले गेलेलं नवीन सरकार यामुळे राज्य सर्व ढवळून निघाले. दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत शिवसैनिकांवर अन्याय झाल्याने, अपक्ष निवडणूक लढवायला भाग पाडले गेले. परंतु, माजी पालकमंत्री अनिल परब यांना झालेल्या अन्यायाची व्याजासकट परतफेड केली जाईल, असा सज्जड इशाराच आमदार योगेश कदम यांनी दिला आहे. शिंदे गटात सहभागी झाल्यावर आमदार योगेश कदम यांच्याहस्ते मतदारसंघात पहिल्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन झाले. यावेळी योगेश कदम यांनी खरमरीत शब्दात परबांवर टीका केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, हे आपले सरकार आहे, मुख्यमंत्री महोदय आपले आहेत, असा ठाम विश्वास व्यक्त करत माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे. बदलत्या राजकिय परिस्थितीतही आमदार योगेश कदम यांनी मतदारसंघात विकासकामांचा झंझावात सुरूच आहे. विकासकामांची काळजी करू नका हे सरकार आपले आहे युतीचे सरकार आहे, असे सांगून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अधिकचे बळ देण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी यावेळी दिले.
दुर्देवाने आपल्या शिवसेनेचेच पालकमंत्री अनिल परब पक्ष संपवायला निघाले होते. परिवहन मंत्री असताना परिवहन खात्याचे काहीही काम करायचे नाहीत. फक्त योगेश कदमना संपवून मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचे कारस्थान करून रामदास कदम व योगेश कदमांविरोधात षडयंत्र रचण्याच्या बैठका मुंबईत अनिल परब घेत होते, असा घणाघाती आरोपही आमदार योगेश कदम यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात अनिल परब यांनी मतदारसंघात संघटनेत केलेले फेरबदल हाच विषय येथील राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू असेल हे स्पष्ट आहे.