बराच काळ काम रेंगाळलेल्या रत्नागिरीच्या मध्यवर्ती एसटी बसस्थानकाचे अखेर ११ मे रोजी उद्घाटन होणार आहे. राज्याचे परिवहनमंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्यासह पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यासह आमदार आणि खासदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. रविवारी ११ मे रोजी सायंकाळी ५ वा. हा उद्घाटन समारंभ संपन्न होईल. रत्नागिरी एसटी बसस्थानकाची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. ५ वर्षे काम रखडले होते. अनेक अडचणींमुळे काही काळ काम बंद पडले होते. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
शेवटी पालकमंत्र्यांनी एमआयडीसीच्या माध्यमातून निधीचा प्रश्न मार्गी लावला आणि २१ कोटी रूपये खर्च करून हे नविन बसस्थानक उभे राहिले. निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीने हे स्थानक मार्गी लावले आहे. आता या बसस्थानकात बसेस लावण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून नियंत्रण कक्ष, एसटी कँटिन यांसह एकूण १८ स्टॉलधारक असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. रत्नागिरीचे मध्यवर्ती बसस्थानक पुन्हा गजबजणार असल्याने बाजारपेठेवरही त्याचा परिणाम दिसणार असल्याने व्यापाऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.