रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाहनचालक करणाऱ्या चुका, तोडणारे नियम यामुळे मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्हा वाहतूक पोलिसांनी अनेकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. गेल्या सव्वा वर्षांमध्ये नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनधारकांकडून रत्नागिरी जिल्हा वाहतूक पोलिसांनी तब्बल ६ कोटी १३ लाख १९ हजार १५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये हेल्मेट शिवाय फिरणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या सर्वाधिक आहे.
जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ या सव्वा वर्षांच्या कालवधीत १ लाख ९४ हजार २४ वाहन चालकांवर कारवाई करून ही दंडवसुली झाली आहे. या कारवाईत हेल्मेट नसलेल्या दुचाकी चालकांनी सर्वात जास्त, १ कोटी ७४ लाख ७८ हजार रुपये दंड भरला आहे. याव्यतिरिक्त चारचाकी वाहनात सीटबेल्ट न वापरणाऱ्या वाहन चालकांकडून २६ लाख ७५ हजार रुपये, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करण्यावर बंदी असून देखील अनेक जण आदेश झुगारून मोबाईलचा वापर करणाऱ्यांकडून २ लाख २४ हजार रुपये, विमा नसताना वाहन चालवणाऱ्या चालकांकडून १० लाख ८ हजार ८०० रुपये, विनापरवाना वाहनधारकांकडून २७ लाख ५५ हजार रुपये, तर फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहन चालकांना १७ लाख २७ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
मनाई असलेल्या भागामध्ये वाहन लावणे, दुचाकीवरून तिन जणांनी प्रवास करणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, धूम स्टाईल अतिवेगाने वाहन चालवणे इत्यादी इतर कारणांमुळे एकूण १ लाख ९४ हजार २४ वाहन चालकांना दंड भरावा लागला आहे. अशा प्रकारच्या वाहन चालवण्यामुळे अनेक वेळा सामान्य जनतेला अपघाताला बळी पडावे लागते.