जिल्ह्यात यापूर्वी आलेला पूर, वादळाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे आणि समन्वयाने काम करावे. कोणतीही दुर्घटना होऊ नये याची दक्षता घ्यावी. दरडप्रवण क्षेत्रात दरड कोसळू नये, यासाठी उपाययोजना कराव्यात. घाट परिसरात सर्वाधिक दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी केल्या. जिल्ह्यातील दरडग्रस्त ४४ गावांमध्ये संरक्षण भिंत, गॅबियन भिंत व गटर बांधणे, पुनर्वसन करणे आदी कामांसाठी ३८ कोटी ९३ लाखांचे ४४ प्रस्ताव, तर कोकण आपत्ती सौम्यीकरण उपाययोजनेंतर्गत ७३ कामांचे ५८७ कोटी ५८ लाखांचे प्रस्ताव शासनाला सादर केले असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज मॉन्सूनपूर्व तयारी आढावा बैठक झाली. पालकमंत्री म्हणाले, चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर या तालुक्यांमध्ये पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. पूर निवारणासाठी संबंधित विभागांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
नद्यांमधील गाळ तत्काळ काढून घ्यावा आणि हा गाळ नदीकिनारी न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी विभागस्तरावर बैठक आयोजित करून आपत्ती काळात करावयाच्या कार्यवाहीचा आढावा घ्यावा. तसेच जिल्हा परिषदेने शाळांची दुरुस्ती करावी. आरोग्य विभागाने औषधसाठा, रुग्णवाहिका, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी याबाबत आढावा घेऊन पावसाळ्यातील साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी यंत्रणा तयार करावी. बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
अनधिकृत होर्डिंग्ज तत्काळ काढा – पावसाळ्यात होर्डिंग्जमुळे अपघात होऊ नयेत, यासाठी जिल्ह्यातील अनधिकृत होर्डिंग्ज तत्काळ काढून टाकावेत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी होर्डिंग्जबाबत सव्र्व्हेक्षण करून अहवाल सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. महावितरणने पावसाळ्याच्यादृष्टीने दुरुस्तीची कामे तत्काळ पूर्ण करावीत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचाव कार्यासाठी मदत करणाऱ्या संघटनांचे आपत्ती व्यवस्थापन कीट ठेवण्यासाठी प्रत्येक पालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, असे सामंत यांनी सांगितले.