मुंबई गोवा महामार्गावरील बहुचर्चित परशुराम घाट दिवसातील पाच तास बंद ठेवल्याने चौपदरीकरणाच्या कामाला प्रचंड वेग आला आहे. या घाटातील जुन्या रस्त्यावर भराव टाकून बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या आठ दिवसात घाटातील अतिशय धोकादायक ठरलेल्या ठिकाणी सपाटीकरणाचे काम पुर्ण करून तातडीने कॉक्रिटीकरणाच्या कामालाही सुरवात केली जाणार आहे. परशुराम घाटातील धोकादायक स्थितीत असलेल्या ५०० मिटर अंतरातील डोंगर कटाई व सरंक्षण भितीस भराव करण्यासाठी २५ एप्रिल ते १० मे दरम्यान घाटातील वाहतूक दुपारी १२ ते सायंकाळी ५ दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार मंगळवारपासून घाट बंद ठेवून कल्याण टोलवेज कंपनीने अतिशय धोकादायक असलेल्या ठिकाणी कामाला सुरवात केली आहे. त्यासाठी घाटातील जुन्या रस्त्यावर भराव टाकून दुसऱ्या मार्गाने वाहतूक सुरू ठेवण्याचे नियोजन केले आहे. त्याप्रमाणे मंगळवारी पोलिस बंदोबस्तात घाट बंद ठेवून काम सुरू केले आहे.

परशुराम घाटातील वाहतूक पाच तास बंद असल्याने या मार्गावरील वाहने चिरणी- आंबडस- चिपळूण मार्गे वळविण्यात येत आहेत. त्यासाठी कळंबस्ते व परशुराम घाटात पोलिस छावणी उभारण्यात आली आहे. काही अवजड वाहने परशुराम घाटाच्या पायथ्याशी उभी करून ठेवली आहे. या वाहनांची लांबच लांब रांग लागली आहे. सायंकाळी ५ वाजता घाट खुला होताच ही वाहने सोडण्यात येणार आहेत. रस्त्याच्या बाजुस रिफ्लेक्टर लावण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. परंतू अद्यापही या सूचनांचे पालन होताना दिसत नाही.