मागील वर्षी चिपळूणात आलेल्या नदीच्या महापुरामुळे, अनेक भागातील नद्यांच्या गाळ उपसा अनेक वर्षे केलाच गेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात असणाऱ्या मोठ्या नद्यांमधील गाळाचा उपसा करण्यासाठी शासनाकडून निधीची मागणी करण्यात येत आहे. परंतु, निधी हा प्रत्येक वेळी पुरेसाच मिळतो किंवा मागणीनुसार मिळेलच असे नाही. त्यामुळे अनेक वेळा लोक सहभागातून देखील निधीची तरतूद केली जात आहे.
त्यानुसार, राजापूर तालुक्यातील दरवर्षी अर्जुना-कोदवली नद्यांना पूर येवून शहराला भेडसावणार्या पूर समस्येवर मात करण्यासाठी लोकसहभागातून गाळ उपसा करण्याचा निर्धार राजापूर वासियांनी केला आहे. या गाळ उपशाच्या उपक्रमासाठी आमदार राजन साळवी यांनी आपले एक महिन्याचे वेतन देण्याचे जाहीर केले आहे.
महसूल विभाग, राजापूर नगर पालिकेने नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने अर्जुना आणि कोदवली नद्यांमधील गाळ उपसा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी लागणारा डिझेल व अन्य खर्च लोकसहभागातून उभा केला जाणार आहे. त्याबाबत गेल्या महिन्यात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गाळ उपशाच्या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार राजापूरवासीयांनी केला आहे. नदीपात्रातील उपसलेला गाळ नद्यांच्या काठावरच रचून न ठेवता अन्यत्र हलविण्याचेही बैठकीमध्ये निश्चित करण्यात आले आहे.
नव्या वर्षामध्ये गाळ उपशाच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात केली जाणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजनमधून सुमारे पंचवीस लाखाचा निधी गाळ उपशासाठी देण्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे, या बैठकीत विविध सामाजिक संघटनांसह वैयक्तिक स्तरावर देणगी देण्याचे अनेकांनी जाहीर केले आहे. लोकसहभागातून निधी उभारणी होत असताना खारीचा वाटा म्हणून आमदार साळवी यांनीही गाळ उपशाच्या उपक्रमासाठी आपले एक महिन्याचे वेतन देण्याचे जाहीर केले आहे.