यंदा जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच पाण्याचा तुटवडा जाणवू लागल्याने, अनेक गावांमध्ये पाण्याचा पुरवठा विविध मार्गाने सुरु झाला आहे. त्याप्रमाणे जिल्ह्याच्या पाणी नियोजन आराखड्यामध्ये पाण्याचे स्त्रोत नेमून दिलेले आहेत. प्रत्येक तालुक्यानुसार विविध पाण्याचे स्त्रोत निवडलेले असल्याने पाण्याची टंचाई दूर करण्यास ते उपयुक्त ठरणार आहेत. पावसाची अनियमितता आणि ऋतूंचा सुरु असलेला लपंडाव त्यामुळे यावेळी दोन महिने आधीपासूनच पाण्याच्या टंचाईच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
जिल्हा नियोजनमधून राजापूर तालुक्याला बारा विंधन विहिरी मंजूर झाल्या आहेत. त्यामध्ये सुमारे ९ लाख १५ हजार रुपये निधी प्रस्तावित आहे. ज्या गावांमध्ये विंधन विहिरी मंजूर झाल्या आहेत त्या ग्रामपंचायतींना संबंधित कामाचे तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पंचायत समितीकडून देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे बारापैकी दहा ग्रामपंचायतीचे प्रस्ताव आले असून उर्वरित प्रस्ताव प्राप्त होण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी सागर पाटील यांनी दिली.
राजापूर तालुक्यातील कारवली-धनगरवाडी, वाटूळ-बेलाचे कोंड, कणेरी-टोकळवाडी, ओझर-भोजवाडी, विल्ये-शेंगाळेवाडी, गोवळ-वरची गुरववाडी, पडवे-ठुकरूलवाडी भाग-१, भालावली-धनगरवाडी, देवाचेगोठणे-परवडीवाडी, शीळ-काशिनाथ गोंडाळ यांचे घराजवळ, ससाळे-जोगळेवाडी, जैतापूर-मधली आगरवाडी येथे विंधनविहीर मंजूर आहेत. मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही तालुक्याला दरवर्षी पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागते. दरवर्षीच्या या स्थितीमध्ये यावर्षीही फारसा बदल होणार नसल्याने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ही उपाय योजना करण्यात येत आहे.
राजापूर शहरात दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे या टंचाई काळात शहरि भागामध्ये एक दिवसा आड पाणीपुरवठा केला जातो. कोदवली धरणात दर पावसाळ्यात येणा-या पुरामुळे मोठय़ा प्रमाणावर गाळाचा साठा झाल्याने, कित्येक वर्षे हा गाळ उपसा न केल्याने धरणात पाणीसाठा होत नाही.

