सध्या देशभरात चर्चेत असणारे श्रद्धा वालकर हत्याकांडाबद्द्ल सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. लव्ह जिहाद च्या नावाखाली हिंदू महिला- मुलींवर अत्याचार केले जात आहेत. अशा या धर्मांध शक्तींविरोधात केंद्र शासनाने कायदा करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करीत हिंदू जनजागृती समिती व हिंदुत्ववादी संघटनेने रविवारी शहरातील चिपळूण नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन छेडले.
देशातील काही धर्मांध शक्तींनी जिहादच्या माध्यमातून राष्ट्राची संस्कृती, धर्म आणि राष्ट्र संपविण्याचे षडयंत्र सुरू असल्याने हे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलना दरम्यान सहभागी सर्व पदाधिकारी, सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आफताबने श्रद्धाची ३५ तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवून केलेल्या क्रूर निघृण हत्येमुळे सारा देख हादरून गेला. त्यामुळे आफताबला फाशी द्या, लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदे करा, राष्ट्राची एकता, संस्कृती, धर्माविरोधी काम करणाऱ्यांना कठोर शासन करा, अशा विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनामध्ये हिंदू जनजागृती समितीचे सुरेश शिंदे, भाजप शहराध्यक्ष आशिष खातू, संजय जाधव, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विनोद बोबस्कर, रत्नदीप देवळेकर, प्रणय वाडकर, निनाद आवटे, रश्मी गोखले आदी सहभागी झाले होते. त्याचवेळेस देशभरात अनेक समस्या असताना, असल्या विषयावर कसले आंदोलन करता! असे नगरपालिकेसमोर आंदोलन सुरू असताना एका तरुणाने हस्तक्षेप करत विचारले. आणि ‘कोणत्याही विषयावर कसले आंदोलन करता, मुलांच्या शिक्षणासाठी आंदोलन करा’, असे वक्तव्य केले. त्याचा राग आल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे काहीसे तणावाचे वातावरण बनले होते. त्यानंतर त्या तरुणाला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी त्याला योग्य समज देऊन सोडून दिले.