कोल्हापूर शिरोळ मधील हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेल्या अभूतपूर्व निर्णयाचा अनेक जिल्ह्यांनी आपापल्या इथे राबविण्याचा प्रयत्न करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामध्ये पेठमाप येथील परीट समाजाच्या विशेष सभेमध्ये विधवा प्रथा बंदबाबत एकमुखाने ठराव करण्यात आला. अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरापैकी विधवा प्रथा बंद करण्याबाबत ग्रामीण भागात विविध ठिकाणी ग्रामसभेच्या माध्यमातून ठराव केले जात आहेत.
चिपळूण शहरात याबाबत अद्याप निर्णय झाला नव्हता; मात्र स्वच्छतेच्या माध्यमातून गावातील घाण आणि अस्वच्छता साफ करणारे आणि आपल्या प्रभावी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील वाईट विचार आणि अंधश्रद्धेची घाण साफ करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विचारांवर चाललेला परीट-जिनगर समाज. या समाजाची ओळख वारकरी संप्रदायाची प्रथा लाभलेला समाज अशी आहे. या समाजाच्या विशेष सभेमध्ये अध्यक्ष स्वप्नील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
महाराष्ट्र परीट सेवामंडळाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांनी सांगितल्याप्रमाणे पतीच्या निधनानंतर विधवा पत्नीचे ना कुंकू पुसले जाणार, ना बांगडी फुटली जाणार, न सौभाग्याचे अलंकार उतरवले जाणार असा सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला आणि विधवा प्रथा बंद करून परीट-जिनगर समाजाने आदर्श ठेवला आहे. विधवा महिलेला समाजामध्ये सन्मानाची वागणूक दिली गेली पाहिजे. हळदीकुंकूसारख्या महत्वपूर्ण कार्यक्रमांना तिला वाईट वागणूक न देता, तिला न डावलता तिचा देखील वाण देऊन सन्मान केला पाहिजे, अशा महत्त्वपूर्ण बदलांना सुरुवात करण्यास सांगितले आहे.
नगरध्यक्षा सावित्री होमकळस, सुनीता महाडीक, सीमा कदम, प्रिया शिंदे, स्वाती कदम यां सारख्या समाजातील सर्व अनेक महिलांनी आपले या विषयी विचार मांडले. समाजातील जेष्ठ दशरथ पावसकर, सूर्यकांत शिंदे, संजय कदम या मंडळींनीही विधवा प्रथा बंदला दुजोरा दिला. मंदिराचे माजी अध्यक्ष दीपक महाडीक यांनीही उत्कटतेने आपल्या भावना मांडल्या. या ऐतिहासिक निर्णयाच्या वेळी कृष्णा कदम, अजित पावसकर, प्रसाद कदम, मिलिंद कदम, मुकुंद कदम, सुशील शिंदे, रोहन कदम, मंगेश शिंदे, , प्रसाद होमकळस, प्रशांत सातारकर, आलोक कदम, सर्व समाजबांधव आणि भगिनी उपस्थित होते.